ऑनलाईन टीम मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची होत आहे.
या प्रकरणात आता मनसेने उडी घेतली असून, पंगा घेऊ नकोस! मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळेललं सहन करणार नाही. तसेच ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावे, असे मनसेने म्हटले आहे.
माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असं म्हणत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाला सज्जड इशारा दिला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो… कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी कंगणाला सुनावले आहे.
दरम्यान, बॉलिवूडसह मराठी कलाकारही कंगणावर चांगलेच संतापले आहेत. एवढं नाही तर आता कंगणावर सोशल मीडियावरून टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. ‘कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai’, अशा शब्दांत काही कलाकालांनी कंगनाला सुनावले आहे.