प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी जिल्हय़ातून 104 बसेस आणि सुमारे 450 चालक-वाहकांसह अधिकारी, कर्मचारी, मेकॅनिक यांना पाठवण्यात येणार आहे. मुंबईत 8 ऑक्टोबरपासून सेवेत हजर राहण्याच्या सूचना सर्व आगारांना देण्यात आल्या आहेत. कोरोना काळात एस्टी बससेवा पूर्वपदावर आलेली नसतानाच घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्हय़ात एस्टी सेवेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आणि कोरोना संसर्गामुळे कर्मचारीही मुंबईत जाण्यास नकार देत असल्याचे चित्र आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून बेस्ट उपक्रमास दैनंदिन चालनासाठी राज्यभरातून तब्बल 1 हजार बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्यस्थितीत टप्प्याटप्प्याने बसेस त्या-त्या जिल्हय़ातून उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आता रत्नागिरी जिह्यातूनही 104 एसटी बसेसची मागणी करण्यात आली आहे. तसे पत्र महाव्यवस्थापकांकडून रत्नागिरी विभाग नियंत्रकांना आणि त्यांच्याकडून जिह्यातील सर्व एस्टी आगार व्यवस्थापकांना पाठवून आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठीचे शेडय़ूलही आगार व्यवस्थापकांना ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार जिह्यातील रत्नागिरी 19, दापोली 12, खेड 13, चिपळूण 13, गुहागर 10, देवरूख 12, लांजा 8, मंडणगड 9, राजापूर 8 याप्रमाणे या बसेस 7 व 8 ऑक्टोबर रोजी मुंबईत रवाणा होणार आहेत.
जिल्हयातून जाताना या बसेसमधून प्रवासी वाहतूक करून उत्पन्न मिळावे म्हणून एक-एक तासाच्या फरकाने या बसेस मुंबईला सोडण्यात येणार आहेत. आठ वर्षांपेक्षा कमी आयुर्मान असलेल्या सुस्थितीत असलेल्या बसेस पाठवण्याच्या सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक बसमागे प्रत्येकी दोन चालक, दोन वाहक असे 416जण पाठवले जाणार आहेत. मुंबईतील माहिती असलेल्या आणि निर्व्यसनी तसेच 55 वर्षाच्या आतील असलेल्या चालक-वाहकांना या उपक्रमासाठी प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. विभागातून 11 कारागिर, रत्नागिरी व चिपळूण डेपोतून एक-एक वाहतूक नियंत्रक, मार्ग तपासणी पथकातील अधिकारी, कर्मचारी, लिपीक असे सुमारे 450 कर्मचारी, अधिकारी या बसेस बरोबर मुंबईला जाणार आहेत.
मार्चच्या तिसऱया आठवडय़ात कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. त्यानुसार पाच महिने बससेवा पूर्णत: बंद होती. आता हळूहळू बससेवा सुरू करून ती पूर्वपदावर येऊ लागली असली तरी अजूनही अनेक गावांत बसेस सुरू झालेल्या नाहीत. रेल्वेसेवा बंद असतानाच एस.टी. सेवेला चांगली पसंती मिळत आहे. असे असतानाच आता जिल्हय़ातील चालक, वाहक तसेच बसेस मुंबईत पाठवण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम जिल्हय़ात एस.टी.च्या वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱयाना वेतन मिळालेले नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे हाल होत आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना स्थिती लक्षात घेता एस.टी.चे कर्मचारी मुंबईत जाण्यास नकार देत असल्याचे वृत्त आहे.