विक्रमी 42 वे जेतेपद पटकावण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील, मध्यप्रदेशला पहिल्यावहिल्या जेतेपदाची अपेक्षा
बेंगळूर / वृत्तसंस्था
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून (बुधवार दि. 22) चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱया निर्णायक अंतिम लढतीत एकीकडे, मुंबईचा संघ ऐतिहासिक 42 व्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे, मध्यप्रदेशचा संघ आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल, अशी अपेक्षा आहे. कागदावर मुंबईचा संघ भारी आहे. मात्र, मध्य प्रदेशला येथे चमत्कार अपेक्षित आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरु होईल.
मागील काही हंगामात सातत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवत आलेल्या मुंबईच्या सर्फराज खानच्या खेळात यंदा बरीच सुधारणा दिसून आली असून त्याने केवळ 5 सामन्यातच 800 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली आहे. यशस्वी जैस्वाल क्वॉर्टरफायनल व सेमीफायनलमध्ये उत्तम धावा झळकावण्यात यशस्वी ठरला असून फायनलमध्येही त्याच्याकडून संघाला यात सातत्य अपेक्षित असेल.
पृथ्वी शॉ मुंबईच्या टिपिकल खडूस फलंदाजांमध्ये मोडत नाही. मात्र, विरेंद्र सेहवागची आक्रमकता त्याच्याकडे असून या बळावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याची त्याची क्षमता महत्त्वाची ठरु शकते. अरमान जाफरने त्याचे काका वासिम जाफरनी दिलेल्या योगदानाच्या तुलनेत 50 टक्के मजल मारली तरी ते भरपूर असेल. सुवेद पारकर व हार्दिक तमोरे हे देखील आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतील. मुंबईकडे डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी (37 बळी व 292 धावा) व ऑफस्पिनर तनुष कोटियन (18 बळी व 236 धावा) मोक्याच्या क्षणी निर्णायक योगदान देऊ शकतात.
मध्यप्रदेश संघात बरीच सुधारणा
मुंबईचा संघ यंदाही मजबूत आहे. मात्र, याचवेळी मध्यप्रदेश संघाने देखील अलीकडील कालावधीत बरीच सुधारणा केली असल्याने ते तोडीस तोड लढत देणार का, याची उत्सुकता असेल. फलंदाजीत वेंकटेश अय्यर व गोलंदाजीत स्पीडस्टार अवेश खानची उणीव जरुर जाणवेल. मात्र, कुमार कार्तिकेयची वैविध्यपूर्ण गोलंदाजी हे त्यांचे बलस्थान असेल. हिमांशू मंत्री व अक्षत रघुवंशी यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली असून तेही येथे अर्थातच महत्त्वाकांक्षी असतील. आयपीएलमध्ये लक्ष वेधून घेणारा रजत पाटीदार देखील उपयुक्त योगदान देऊ शकतो.