- सार्वजनिक ठिकाणी फटाके आणि आतषबाजीला मनाई
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सणानिमित्त मुंबई महापालिकेने काही निर्णय घेत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
त्यासोबतच यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला हात – पाय – चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशी मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.
तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.
- नवीन नियम :
- कोविड 19 बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.
- सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.
- या वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई केली जाणार आहे.
- तथापि, दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजा, अनार यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे.
- ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि सर्वांना मास्क वापरणे आवश्यक आहे.
- यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रीकरण टाळावे. यामध्ये दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.
- यासोबतच भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.