ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसाने तिला रोखत कारवाई केली. परंतु पोलिसाने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेने पोलिसांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाण प्रकरणी आरोपी महिला सादविका तिवारी आणि तिचा मित्र मोहसीन खान यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर चांगलेच राजकारण पेटलेले दिसले. याबाबत बोलताना मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, ही घटना काल दुपारची आहे. एलटी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत हवालदार ड्युटी करत होते. यावेळी त्यांनी हेल्मेट न घातलेल्या दुचारीस्वाराला रोखलं आणि त्यानंतर झालेल्या बाचाबाची झाली. त्यानंतर या महिलेने पोलिसाला मारहाण केली. दुचाकीस्वाराला आणि महिलेला अटक करुन त्यांना कोर्टात हजर केलेे असून त्यांच्या कोठडीची मागणी केली आहे. दोघांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती यांनी दिली.
तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही अंत्यत दुर्दैवी गोष्ट आहे असे सांगत मुंबई पोलीस आयुक्तांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचेच आहे. कर्तव्याचे पालन करणाऱ्या हवालदारावर हात टाकणारे हे लोक कोण आहेत आहेत? यांच्यात हिंमत कुठून येते? यात सरकार कोणाचे आहे हा प्रश्न नाही. मुंबई पोलीसच नाही तर देशातल्या कोणत्याही पोलिसांवर हात टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि या अशा लोकांवर जरब बसली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट पणे सांगितले.