- ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई आणि एम एम आर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्यावरून ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या समितीला आठवडाभरात आपला अहवाल द्यायला सांगण्यात आले आहे.
मुंबईत भविष्यात असा वीज ठप्प होण्याचा प्रकार होऊ नये यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आयलँडिंग यंत्रणेची नवी डिझाइन तयार करा अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी केली. ऊर्जा मंत्री डॉ राऊत यांनी आज प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्यावर सखोल चर्चा केली. या बैठकीला महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक उपस्थित होते.महापारेषण विभागातर्फे या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून शनिवारपर्यंत आम्ही आपला अहवाल सादर करू असे महापारेषणच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर बोलताना मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
1981 पासून राज्यात लागू करण्यात आलेली आयलँडिंग यंत्रणा ही मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सोयीसाठी उभारण्यात आली का? 1981 च्या तुलनेत आज लोकसंख्या वाढली, तंत्रज्ञान बदलले आणि वीज निर्मितीही वाढली. मग या यंत्रणेत गेल्या 40 वर्षात काय बदल केले गेले? जगातील प्रमुख महानगरामध्ये आयलँडिंग यंत्रणा कशी काम करते? त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो?याचा आजवर तुम्ही काही अभ्यास केला का? हा प्रश्न लगेच उदभवू नये म्हणून आणि भविष्यात 30 वर्षात उदभवू नये म्हणून कोणत्या योजना तुम्ही आखल्या?, असे प्रश्नच त्यांनी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले.
या सर्व प्रश्नांची उत्तरे अंतर्गत चौकशी अहवालात शनिवारपर्यन्त मला हवी आहेत आणि गुरुवारी आपण यावर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करु, असेही ते म्हणाले. ‘तुम्ही जबाबदारी फिक्स करा नाहीतर मी जबाबदारी फिक्स करून कारवाई करेल,’असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.