ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई शहर आणि उपनगरात काल पडलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. त्यानंतर आजही मुंबई शहर व उपनगरातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तसेच सकाळी 11.36 मिनिटांनी समुद्रात 4.4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे म्हटले आहे.
हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे येथे घाट विभागांमध्येही रेड अलर्ट चा इशारा दिला आहे.
मुंबईत महापालिकेच्या सर्व विभाग नियंत्रण कक्षांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.