राज्य सरकारची तत्वत मान्यता खासदार सुनील तटकरेंची माहिती
मुंबई-गोवा, सागरी महामार्गामधून नवीन मार्ग प्रस्तावित
प्रतिनिधी / चिपळूण
मुंबई ते पुणे, नागपूर येथे ज्याप्रमाणे ‘एक्सप्रेस वे’ झाले त्याचप्रमाणे कोकणसाठी स्वतंत्र मुंबई ते सावंतवाडी ‘एक्सप्रेस वे’ प्रस्तावित असून त्याला राज्य सरकारने तत्वत मान्यता दिली आहे. सध्याच्या मुंबई-गोवा आणि सागरी महामार्ग या दोन्हीच्यामधून हा नवा मार्ग काढला जाणार असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात 4 हजार 500 कोटांचा निधी मंजूर केला आहे. एमएसआरडीएच्या माध्यमातून या महामार्गाच्या कामाबाबात जानेवारीपर्यंत निविदा मागवून प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली जाईल. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही पूर्णत्वास नेणे आहे. या दोन्ही महामार्गाबरोबरच कोकणसाठी स्वतंत्रपणे नव्या ‘एक्सप्रेस वे’साठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. मुंबई-सावंतवाडी या ‘एक्सप्रेस वे’ला राज्य सरकारने तत्वत मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीत त्याला मान्यता मिळाल्यानंतर डीपीआर, अलाईनमेंटबाबतची कामे सुरू होतील. भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते झाले तर पर्यटन विकासाला अधिक गती येणार आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी आणि कामगार विधेयक ही दोन्हीही शेतकरी व कामगारांना उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. मुंबई-गोवा महामार्गाची सध्या चाळण झाली आहे. या संदर्भात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दोनच दिवसांत बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र तेच कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने तो विषय थांबलेला आहे. तरीही नोव्हेंबरमध्ये महामार्गाचे मुख्य अभियंता, ठेकेदारांसह आपल्या मतदार संघातील महामार्गाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ईएसआय’ संदर्भात कामगार मंत्र्यांना भेटणार
ईएसआय योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नसल्याबद्दल खासदार तटकरे म्हणाले की, या संदर्भात निवेदने मिळाली आहेत. दोनच दिवसांत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार आहे. याला मान्यता देण्याचे काम भारत सरकारकडून असेल तर राज्य सरकारच्या कामगार आयुक्त व कामगार मंत्र्यांची शिफारस घेऊन रत्नागिरी जिल्हा ईएसआयमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव स्वत: दिल्लीला नेऊन पुढे पाठपुरावा करू, असेही तटकरे यांनी सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, माजी सभापती शौकत मुकादम आदी उपस्थित होते.