नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते मनीष तिवारी यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केले असून त्यात 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर पेलेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँगेसप्रणित सरकारने घेतलेल्या डळमळीत भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. हा काँगेसला घरचा आहेर मानण्यात येत आहे. या पुस्तकामुळे भाजपच्या हाती आयतेच कोलित लागले असून त्याने काँग्रेसची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे काँगेस तिवारींसंबंधी कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय तज्ञ व काँगेसचे विरोधक मोठय़ा उत्सुकतेने पहात आहेत.
हा हल्ला झाला तेव्हा तिवारी केंद्रात मंत्री होते. मुंबईवरच्या हल्ल्याला त्या सरकारने जशास तसे प्रत्युत्तर दिले नाही. सरकारची भूमिका भ्याड आणि बोटचेपी होती. देशाच्या सुरक्षेकडे या सरकारने दुर्लक्ष केले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर न दिल्याने सरकारची प्रतिमा मलीन झाली, अशी माहिती तिवारी यांनी या पुस्तकात दिली आहे, असे सांगण्यात येत आहे. या पुस्तकाचा आधार घेऊन भाजपनेही काँग्रेसवर देशाच्या सुरक्षेकडे सरसकट दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
भाजपची टीका
मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील काँगेस सरकार देशाच्या सुरक्षेसंदर्भात किती कणाहीन, निरुपयोगी आणि असंवेदनशील होते, हेच या पुस्तकारुन स्पष्ट होते, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे. मुंबईवरील हल्ल्यात किमान 166 निरपराध नागरीकांचा बळी गेला होता. हा हल्ला 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता. हा हल्ला 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी सुरु झाला आणि पुढचे तीन दिवस या दहशतवाद्यांनी मुंबईला जणू ओलीस ठेवले होते.