ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या रस्त्यांवर आता तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही कारण मुंबई पोलिसांकडून आता मुंबईमधील भिकाऱ्यांविरुद्ध ‘भिक्षेकरी पकड मोहीम’ राबविण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकऱ्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.
भिक्षेकरी पकड मोहीम अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणाऱ्या लोकांना मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारी पासून या मोहिमेला सुरवात करण्याचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश दिले आहेत. त्यांची कोविड चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येईल.
मुंबईतील आज पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील 14 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील ‘भिक्षेकरी स्वीकार गृह’मध्ये त्याची सोय केली जाईल. तसेच या भिकाऱ्यांना भोईवाडा कोर्टात हजर केले जाणार आहे. आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.