स्टॉकिंग म्हणजे पाठलाग. मुलींना हा त्रास नेहमी होतो. शाळा-कॉलेजात जाताना, नोकरीवर जाताना, अगदी भाजी मंडईत जातानाही पाठलाग करणे, रस्त्यावर अडवून बोलायचा प्रयत्न करणे, असे प्रकार खूप वेळा घडतात. अशा वेळी व्यक्ती कोण आहे ते त्या मुलीला, तरूणीला कळते तरी. ती अशा पाठलाग करणार्याविरोधात पोलिसांची नाही तरी घरातील वडिलधार्यांची मदत तरी घेऊ शकते. पण सायबर स्टॉकींग हा वेगळाच प्रकार आहे.
सायबर स्टॉकिंगमध्ये असा एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस मुलींना निनावी ईमेल पाठवतो, मेसेजेस पाठवतो, फोन करतो. अशा वेळी अशा बिनचेहर्याच्या माणसाचे काय करायचे हा खरा प्रश्न निर्माण होतो. कारण ज्या मुलीला किंवा महिलेला हा त्रास दिला जातो, तिला हे सगळं कोण करतंय याची काही कल्पनाच नसते. कारण ही व्यक्ती नुसतीच निनावी नसते तर समोर येत नसल्याने तिचा चेहराही कळत नाही. शिवाय तक्रार करायची तरी कुणाविरोधात असा प्रश्नही उभा राहतो. पण आता काळजी करू नका.
- तुम्हाला अशा पद्धतीच्या सायबर स्टॉकींगचा त्रास होत असेल तर तुम्ही पोलिसांत तक्रार करू शकता. पोलिस तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती शोधून काढतील.
- मध्यंतरी, अशी एक घटना मुंबईत घडली. त्यात दोषी माणसाला सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली होती.
- या प्रकरणातील तरूणी एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होती. तिला निनावी ईमेल येऊ लागले. सुरूवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर ई मेल करणार्याची मजल मेसेज पाठवण्यापर्यंत आणि नंतर फोन करण्यापर्यंत गेली. शिवाय ही व्यक्ती त्या तरूणीवर पाळत ठेवल्याप्रमाणे ती कुठे आहे, काय करते आहे, कशी दिसते आहे, हेही त्या मेलमध्ये लिहीत होती. ती तरूणी चांगलीच घाबरली.
- तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा तिला येणारे ईमेल्स वाशी आणि दिल्लीतील गुडगाव येथील आयपी ऍड्रेसवरून येत असल्याचे निदर्शनास आले.
- त्यांनी त्या कंपनीतील कर्मचार्यांची चौकशी केली. त्यात या तरूणीचा एक मित्र होता. पण या मित्राबरोबरची तिची मैत्री तुटली होती. पोलिसांनी या मित्राची चौकशी केली तेव्हा हाच मित्र तिला निनावी ईमेल पाठवत असल्याचे निष्पन्न झाले.
- पोलिसांनी त्याचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्यातील सर्व मेल्स ताब्यात घेतले आणि या तरूणाला शिक्षा करण्यात आली.
- सायबर स्टॉकींग करणार्यांना वाटते की, मेल्स, मेसेजेस डीलीट केले की कुणी त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही. पण ही चुकीची कल्पना आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे कोणतेही गैरकृत्य शोधून काढणे तितके अवघड राहिलेले नाही. त्यामुळे याबाबतीत मुलींनीही न घाबरता पुढे येऊन पोलिसांची मदत घ्यायला हवी.