उत्तरप्रदेशात भाजपला मतदान नको असे आवाहन : बिहारमध्ये मात्र एकत्र
व्हीआयपी (विकासशील इन्सान पक्ष) प्रमुख मुकेश साहनी आता भाजपसोबत आर-पारच्या भूमिकेत दिसून येत आहेत. उत्तरप्रदेश निवडणुकीत मुकेश साहनी यांनी भाजपवर प्रचंड तोंडसुख घेतले असून हे पाहता ते आता भाजपसोबत संबंध ठेवू इच्छित नसल्याचे मानले जातेय. साहनी यांनी सोमवारी उत्तरप्रदेशातील सर्व प्रसारमाध्यमांध्ये जाहिरात प्रसिद्ध करत भाजपविरोधी अजेंडा मांडला आहे. या जाहिरातीनंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
मुकेश साहनी यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत जाहिरात दिली आहे. यात स्वतःच्या छायाचित्रासोबत ‘दिखाएंगे निषादों का बल, नहीं खिलने देंगे कमल’ असा नारा देण्यात आला आहे. त्यांच्या पक्षाने निषाद समुदायाच्या उमेदवारांच्या विरोधात स्वतःचे उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप देणार प्रत्युत्तर
मुकेश साहनी यांच्या या जाहिरातीनंतर भाजपचे प्रवक्ते प्रेमरंजन पटेल यांनी भूमिका मांडली आहे. देशात नरेंद्र मोदींचे सरकार, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार उत्तम कार्य करत आहे. या सरकारांच्या विरोधात कुणी विधाने करत असल्यास ते सहन केले जाणार नाही. आघाडीत राहून घटक पक्षाच्या विरोधात वक्तव्ये केल्यास ते अस्वीकारार्ह आहे. मुकेश साहनी यांचे वर्तन राष्ट्रीय नेतृत्व बारकाईने पाहत असून योग्यवेळी याला चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे पटेल म्हणाले.