अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला मुक्तलक्षणे समजाऊन सांगत आहेत. ते म्हणाले, मुक्त पुरुष देही असून विदेही असतो. त्यामुळे स्वतःहून काही करायचं आहे असं त्याच्या बिलकुल मनात येत नाही. ईश्वरी इच्छेनुसार त्याच्या देहाच्या हालचाली घडत असतात. तो आवश्यकतेनुसार इकडे तिकडे फिरताना दिसतो पण मनाने तो एकाजागी स्थिर बसलेला असतो. तेच त्याचं सहजासन असतं. त्याला समाधी अशी वेगळी लावावी लागत नाही कारण तो कायमच ईश्वराशी एकरूप होऊन समाधी अवस्था अनुभवत असतो. त्यामुळे त्याचा एकांत कधी भंग पावत नाही. प्रत्येकाला जीवनात ईश्वराचाच आधार असतो पण सामान्य माणसाला आपण स्वतःच आपले जीवन तो चालवत आहोत असे वाटत असल्याने स्वतःच्या शरीरातील ईश्वरी अस्तित्व जाणवत नसते. त्याउलट मुक्तपुरुषाला त्याच्या जीवनातील ईश्वराचं अधि÷ान स्पष्ट दिसत असल्याने त्याचं सर्व लक्ष त्यावरच खिळलेलं असतं. त्यामुळे अभिमान त्याच्या जवळपासही फिरकू शकत नाही. ईश्वरी अधि÷ानाशी तो इतका एकरूप झालेला असतो की, त्याला इतरांची उपस्थिती जाणवत नसते. सहजासनावर बसले असता त्याला जे समाधान मिळते, तेच त्याला हिंडता फिरतानाही मिळत असते. आत्मस्वरूपांत बुडी देऊन तो ‘स्नान’ करत असतो. चित्स्वरूपात गुंतलेलं त्याचं मन आत्मस्वरूपामध्येच भिजलेला असल्यामुळे परमपवित्र झालेलं असतं. त्याचे पावित्र्य एव्हढे असते की, त्याचे पाय जिथे जमिनीला स्पर्श करतात ती जागा परमपावन होते. त्याच्या अस्तित्वाने त्याच्या आजूबाजूचा वायूही पवित्र होतो. चरणस्पर्शाने गंगेलाही पवित्र करायचे सामर्थ्य त्याच्यात असते. त्याच्या उदराच्या सहवासाने अग्नीलाही अत्यंत पवित्रता प्राप्त होते. त्याच्या हृदयाच्या पोकळीमध्ये आकाश स्वस्थपणाने राहिलेले असते. त्यामुळे ते पवित्र होऊन सर्वत्र अलिप्त आणि उदास असते.
जे वैकुंठात रहात असतात ते सुद्धा निरंतर त्याच्या भेटीची इच्छा करीत असतात. त्याच्या गोष्टी ऐकायला वेद धावत येतात आणि त्याला डोळय़ांनी पहावयाला देव येतात. त्यामुळे तो स्वतःच एक चालतं बोलतं तीर्थक्षेत्र झालेला असतो. चालतंबोलतं म्हणायचं कारण म्हणजे तीर्थक्षेत्र हे एका ठराविक ठिकाणी स्थिर असतं आणि तेव्हढीच जागा परम पवित्र मानली जाते पण मुक्तपुरुष जिथं जिथं जातो त्या ठिकाणी तिर्थक्षेत्राची निर्मिती होते. ज्याप्रमाणे जेथे राजा असतो तेथे राजधानी असते त्याप्रमाणे जेथे मुक्तपुरुष हजर असतो ते तीर्थक्षेत्र होते. केवळ चित्स्वरूपामध्ये स्नान केल्यामुळे तो सर्ववंद्य व अत्यंत पावन झालेला असतो. हे मुक्ताच्या स्नानाचे लक्षण झाले.
आता त्याचे पहाणे कसे असते ते ऐक. इतर माणसं जे पहात असतात ते त्यालाही दिसतं पण ते सर्व पाहूनही न पहिल्यासारखे त्याची वर्तणूक असते. कारण डोळय़ांना दिसणाऱया गोष्टीशी त्याला काहीही देणेघेणे नसते. त्याला नजरेसमोर केवळ श्रीहरि आणि श्रीहरिच दिसत असतो. इतरांना आजूबाजूला दिसणाऱया गोष्टी पाहण्यात मोठी मौज वाटत असते म्हणून ते कुतूहलाने त्या गोष्टी न्याहाळत असतात पण मुक्त पुरुषाच्याबाबतीत ही गोष्टच संभवत नाही कारण पहावयाचा पदार्थ, पहाणारा, आणि पहाणे ( दृश्य-द्रष्टा-दर्शन) ही त्रिपुटीच नाहीशी झालेली असते. समोर दिसणाऱया निरनिराळय़ा दृश्याना बाजूला सारून, इतरांना दिसत नसलेले आत्मतत्त्वच सर्व सृष्टीत भरलेले त्याला दिसते. अशा दृष्टीमुळे, तोच एक त्रिभुवनामध्ये पावन झालेला असतो. उद्धवा, साधकाने अशी दृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा कारण अशा दृष्टीने जे पाहतात, ते परममुक्त होतात, हे ध्यानात ठेव. असे श्रे÷ भगवद्भक्त मला फार प्रिय असतात. बसणे, जेवणे, निजणे, पहाणे, स्पर्श करणे, वास घेणे, फिरणे, स्नान करणे इत्यादि शारीरिक क्रिया मुक्तपुरुष कशा करतो हे जाणून घेण्याची उद्धवाला फार उत्सुकता होती. म्हणून भगवंतांनी त्याला आत्तापर्यंत मुक्तपुरुषाचं सहजासन कोणतं, त्याचं चालणं कसं, पाहणं कसं, स्नान कसं इत्यादी बाबी खुलासेवार सांगितल्या.