अखेर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या तपश्चर्येला मुक्ताईच्या चरणी अर्पण करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेतृत्व केलेल्या अण्णा डांगे ते गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत घडले तेच थोडय़ाफार फरकाने खडसेंच्या बाबतीत घडले. मात्र मुंडे पक्ष सोडता सोडता थांबले. खडसे यांना पक्ष सोडायची वेळ नेतृत्वानेच आणली आहे. विरोधी पक्षनेतेपदी असताना भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार खडसे कधी त्यांच्या मागच्या बाकावर बसलेल्या देवेंद्र फडणवीस नावाच्या युवा नेत्याच्या मागे पडले आणि कधी महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हातून निसटली हे समजेपर्यंत फडणवीस मंत्रिमंडळातून त्यांना डच्चूही मिळाला होता! भूखंड घोटाळा, महिलेचा विनयभंग, दाऊदच्या पत्नीचे फोन, कथित स्वीय सहाय्यकाची लाचखोरी या आणि अशा प्रकरणाना तोंड देत खडसे सत्तेत परत येण्यासाठी फक्त झगडत राहिले. सत्ताकाळाच्या शेवटच्या दिवशी मात्र त्यांच्या संतापाचा पारा चढलेला महाराष्ट्राने पाहिला. आपण दोषी नसताना त्रास का दिला जात आहे असा प्रश्न करत त्यांनी आपली बाजू मांडायचा विधानभवनात जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना रोखायचे धाडस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेसुद्धा दाखवू शकले नाहीत. विरोधकांनीसुद्धा आपल्यावर शंका घेतली नसताना घरच्याच मंडळीनी शिक्षा दिली, न केलेल्या गुन्हय़ाबद्दल किती काळ त्रास होणार असा प्रश्न करत त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसणाऱया पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांची माफीसुद्धा मागितली होती. पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारले, कन्येला पराभूत केले. याबद्दलचा संताप ते पक्षातूनच व्यक्त करीत राहिले. मात्र दखल घेतली गेली नाही. आमदार, खासदार करण्याची आश्वासने खोटी ठरली. आपल्याकडे फडणवीस सरकारच्या गैरकारभाराबद्दल प्रचंड माहिती आहे असे ते सांगत राहिले. पण गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील एक कमजोर राजकारणी अशी खडसे यांची प्रतिमा झाली तर फडणवीस राज्यातील सर्वात प्रबळ नेते म्हणून पुढे आले. पाच महिन्यांपूर्वी ज्ये÷ नेते नितीन गडकरी यांनीही खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. मात्र ते वक्तव्यही व्यर्थ गेले. जवळच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला खडसे यांनी दिला. तेव्हाही फडणवीसांनी बोलण्यास नकार दिला तर चंद्रकांत दादा पाटील यांनी दोन हाणा पण पक्ष सोडू नका अशी भूमिका घेऊन चेंडू खडसे यांच्याच कोर्टात ढकलला. आता पर्यायच उरला नव्हता. राष्ट्रवादी किंवा अन्य कुठल्याही पक्षाने खडसे यांना स्वीकारायचे तर त्यांना आमदारकी आणि मानाचे मंत्रीपद देणे अगत्याचे होते. कमजोर खडसेंना ते कोण देणार ही भाजप नेत्यांची भावना असावी. मात्र जलयुक्त शिवार प्रकरणात कॅगने दिलेला अहवाल आणि राज्यातील भाजप नेत्यांमध्ये सुरू झालेली चलबिचल या पार्श्वभूमीवर खडसे यांनी पक्ष सोडला आहे. कमजोरावर केलेल्या घावाचा बदला तो घाव घालणारा कमजोर झाल्यावरच घेतो, असे विदुरनीती सांगते. खडसे यांनी नेमकी हीच संधी साधत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला आहे, पक्ष नेतृत्वाबद्दल आपली तक्रार नाही. पक्षाने आपल्याला खूप काही दिले आणि आपणही संपूर्ण आयुष्य पक्षाला दिले. जे मिळवले ते स्वतःच्या हिमतीवर होते, मात्र फडणवीस यांनी आपल्या जिवाशी खेळ केला असा आरोप करत घाव घातला आहे. राष्ट्रवादीने संधी साधत फडणवीसांना शह दिला आहे. भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तंबूत खळबळ माजायला खडसेंचे कारण होणार आहे. आधीच पंकजा मुंडे यांच्यापासून अनेक नेते नाराज आहेत. गोपीनाथ मुंडे प्रति÷ान स्थापन करून त्यांनी भाजपला भीती घातली होती. उर्वरित नेतेही संधीची वाट पहात आहेत. त्यातील काहीनी उचल खाल्ली आहे. वरदहस्त असल्याने फडणवीस विरोधी खेळी आतापर्यंत यशस्वी झाली नव्हती. मात्र भाजपच्या आंदोलनापासून ज्ये÷ नेत्यांनी फारकत घेणे आणि ज्यांना फडणवीसांनी पुढे केले त्याच नेतृत्वाने आंदोलन लावून धरणे यामुळे भाजपमध्ये सुरू असलेली खदखद नजरेसमोर येत होतीच. खडसे यांनी त्याला वाट करून दिली आहे. अर्थात तेवढय़ाने लगेच भाजपमध्ये आउटगोइंग सुरू होईल अशातला भाग नाही. मात्र फडणवीस यांच्या विरोधी वातावरण पसरण्यास आणि त्या निमित्ताने काठावर असणारी काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेली मंडळी भाजपच्या हातून सुटण्यास हे बंड कारणीभूत ठरू शकते. भाजपातील गप्प असणाऱया नेत्यांनाही कंठ फुटू शकतो. अर्थात भाजपच्या अलीकडच्या वाटचालीकडे लक्ष दिले तर आपले नुकसान झाले हे भाजप नेते कधीही मान्य करणार नाहीत. गप्प असणारे प्रवक्ते खडसेंच्या दोषांवर बोलतील. कधी काळी शरद पवार यांनी केलेल्या ‘तोड-पाण्याच्या’ टीकेचीही आठवण करून दिली जाईल. मात्र त्यामुळे भाजपमधली खदखद लपून राहणार नाही. खडसे विविध कारणांमुळे अडचणीत आले. मुंडेंच्यासारखा पाठीराखा राहिला नाही. कौटुंबिक आणि आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्या. हाताशी आलेला मुलगा गेला अशा स्थितीत गेली पाच वर्षे खडसे झगडत होते. पक्षासाठी सर्वस्व देणारे नेहमीच कमजोर असतात, कारण त्यांना स्वतःचे गट निर्माण करणे आणि सांभाळणे जमत नसते. पक्षाविरुद्ध आणि नेतृत्वाविरुद्ध बोलणे म्हणजे शिस्तभंग हे माहीत असल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार खात बसावे लागते. खडसे त्या अर्थाने कमजोर होते. आता मुक्ताईनगरचा हा नेता मुक्त झाला आहे. ओबीसी बहुल उत्तर महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रवादीची ताकद मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राजकारणात ज्याला कमजोर समजले त्याचीही कधीतरी वेळ येते. तशी वेळ खडसेंची येते का, हे काळच सांगेल.
Previous Articleजब शाम ढले आना…
Next Article कंग्राळीतील मराठी शाळेची इमारत होणार दुमजली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.