राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार, शानदार कार्यक्रमात हिरकमहोत्सवी वर्षारंभ
प्रतिनिधी/ पणजी
मुक्तीनंतरच्या 60 वर्षांत गोव्याने साधलेला विकास, देशात सर्वाधिक दरडोई उत्पन्नापर्यंत मारलेली मजल व त्याद्वारे साधलेली नेत्रदीपक प्रगती ही खरोखरच प्रशंसनीय आहे. या विकासात आतापर्यंतची सर्व सरकारे व प्रत्येक गोमंतकीय यांचाही तेवढाच सहभाग आहे, असे गौरवोद्गार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर राष्ट्रपतींच्या सौभाग्यवती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मरणीय दिवस
आजचा दिवस हा गोव्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी विशेष स्मरणीय आहे. पोर्तुगिजांची तब्बल 450 वर्षांची जुलमी राजवट सहन केल्यानंतरही मुक्तीच्या केवळ 60 वर्षांच्या कालखंडातच गोव्याने त्या सर्व जखमा भरून काढल्या व दुःखावर लाथ मारत विकासाच्या दिशेने गरुडभरारी घेतली. ही झेप गोव्याला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी आहे, असे प्रशंसोद्गार पुढे बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी काढले.
धार्मिक सलोखा राखला
राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रगतीशील नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली. त्यांचे राजकीय गुरु तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी ते झटत आहेत. गोमंतकीयांनी समान नागरी कायदा स्वीकारला ही अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच येथील सांस्कृतिक विविधतेस चालना मिळाली आहे. गोमंतकीय बंधू-भगिनीनी लोकशाही व्यवस्था आणि सुशासन मजबूत ठेवण्याबरोबरच धार्मिक सलोखाही कायम राखला. अशाप्रकारे जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच गोवा हे विकासाचा ध्यास लागलेले राज्य बनले आहे, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.
गोवा मुक्तीच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यास मिळाले हे आपले भाग्य असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. गोव्याच्या या 160 किमी लांबीच्या समुद्रतटावर काही सर्वांगसुंदर किनारे आहेत ज्यांची जागतिक किनाऱयात गणना होते. गोव्याचे अप्रतिम अद्वितीय सृष्टीसौंदर्य, विलोभनीय समुद्र किनारे, हिरवीगार वनश्री हे सर्व काही भुरळ घालणारे, प्रभावित करणारे आहे. गोमंतकीय खरोखरच ‘अतिथी देवो भव’ या परंपरेला जपणारे आहेत, आदरातिथ्यशील आहेत याचा आपण अनेकदा अनुभव घेतला आहे. त्यातूनच आपण गोव्याच्या प्रेमात पडलो, त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलेल्या निमंत्रणास लगेच होकार दिला, अशा शब्दात राष्ट्रपतींनी गोव्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.
गोवा आकर्षणाचे केंद्र
स्वच्छ पर्यावरण, दळणवळण यांच्या सुलभ सेवा आणि विपुल नैसर्गिक सौंदर्य यांच्या बळावर आज गोवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. शिक्षण क्षेत्रातही गोव्याने उत्तम प्रगती साधली आहे. गोवा राज्याच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात औद्योगिक क्षेत्राच्या योगदानाची टक्केवारी आज देशात सर्वाधिक आहे. कोविड महामारी विरोधी लढय़ात गोव्यातील फार्मा उद्योगाने देशविदेशात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती कोविंद यांनी गोव्याचा गौरव केला.
गोमंतकीयांच्या चेहऱयावर हास्य फुलवा : कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ’दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ या कवी बाकीबाब बोरकर यांच्या कवितेच्या ओळीतून भाषणाची सुरुवात केली. गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती आणि योगदान देणाऱया सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या स्मारकांचे सदैव स्मरण ठेवावे, तसेच गोव्याची अस्मिता, वेगळेपणा जपण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर सर्व गोमंतकीयांच्या चेहऱयावर हास्य फुलविण्यासाठी वावरणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
भाऊसाहेबांनी गोव्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली : श्रीपाद नाईक
आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात भाऊसाहेबांच्या पोलादी नेतृत्वाने गोव्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली, 1987 मध्ये गोव्याला घटकराज्य दर्जा प्राप्त झाला आणि गोव्याच्या विकासाला आणखीही चालना मिळाली. प्रारंभापासून खाण उद्योगाने आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे. विलोभनीय निसर्ग आणि भुरळ पाडणाऱया समुद्रकिनाऱयामुळे गोव्याला पर्यटन राज्य अशी ओळख मिळाली. त्यातून जगभरातील पर्यटकांचा ओघ गोव्याकडे सुरू झाला तो आजतागायत सुरूच आहे. जलपर्यटनालाही येथे मोठा वाव आहे. पर्यटनाच्या जोडीला कृषी हा सुद्धा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे त्यातही स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. हे काम मोठे आव्हानात्मक आहे. कारण भविष्यात गोव्याला पाण्याचा तुटवडा भासण्याची भीती असल्याने कठोर उपाययोजना करावी लागेल, असे मत व्यक्त केले.
नौदल, वायुदल आणि नौसेना यात नोकरीच्या मोठय़ा संधी आहेत. त्यामुळे केवळ स्थानिक पातळीवर नोकऱया शोधत बसण्यापेक्षा गोमंतकीय तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळेच मुक्तीचा दिवस पाहिला : मुख्यमंत्री
गोवा मुक्तीसाठी अनंत ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या त्यागामुळेच आज आम्ही हा हिरक महोत्सवी वर्धापनदिन साजरा करत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यासह देशभरातील सर्व स्वातंत्र्यसेनानी व तिन्ही दलांच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर जगभरातील सर्व गोमंतकीयांचे अभिनंदन केले. या सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल राष्ट्रपती श्री. कोविंद यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
नवगोमंतक साकारण्यासाठी वावरणाऱया तरुण पिढीचा एक प्रतिनिधी या नात्याने आपण येथे बोलत आहे. गोवा मुक्तीनंतर जन्म झालेला बहुदा मी पहिलाच मुख्यमंत्री आहे. या सहा दशकांच्या वाटचालीचा आढावा घेताना आणि पुढील मार्गक्रमणाची सन्माननीय राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमातून दिशा ठरविण्याचे प्रयत्न करणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी खऱया अर्थाने पवित्र आणि प्रेरणादायी आहे. याच भूमीत नंतर अनेक तेजस्वी रत्ने जन्मास आली आणि त्यांनी गोव्यासह देशालाही जगभरात लौकिक मिळवून दिला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे. हा सोहळा आमचा प्रगल्भ सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्याचा. त्यामुळेच पुढील वर्षभरात आम्ही प्रत्येक ग्रामपातळीवर आणि समाजातील विविध घटकांसमोर जाऊन असे कार्यक्रम सादर करणार आहोत. त्याद्वारे राज्याची संस्कृती, परंपरा, वारसा यांची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुक्तीसोहळा साजरा करून काय साध्य होणार आहे, असे सवाल अनेकांनी उपस्थित केले, त्यांना एकच सांगू इच्छितो की या सोहळय़ाद्वारे आम्ही पुढील 60 वर्षांची ब्ल्यू प्रिन्ट तयार करणार आहोत. शैक्षणिक, उद्योग, व्यापार, कला संस्कृती पर्यटन, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात बदलत्या काळानुसार वाटचाल करायची आहे. आजच्या या दिवशी आम्ही नवगोमंतकाची मुहूर्तमेढ रोवली आहे, हे सांगताना मला अत्यानंद होत आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आम्ही ’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे ब्रिद घेऊन वाटचाल करत आहोत आणि हे नमूद करताना सर्वव्यापी, सर्वस्पर्शी प्रशासन जनतेला देणार याचा पुनरुच्चार करतो, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
तेव्हा आम्ही विद्यार्थीदशेत : राज्यपाल
गोव्यात मुक्तीसंग्राम चालत होता तेव्हा आम्ही विद्यार्थीदशेत होतो. त्यावेळी आपणही गोव्यात केव्हा पोहोचणार असे वाटत होते. आमच्या शूर सैनिकांच्या पराक्रमामुळे पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त झाला आणि मुक्तीच्या या हिरकमहोत्सवी वर्षात राज्यपाल बनून येथे येण्याचा योग आला. त्याद्वारे ते स्वप्नही पूर्ण झाले, असे उद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले.
जो हेतू, जी स्वप्ने बाळगून स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा मुक्तीसाठी बलिदान दिले हेतू अद्याप सर्वार्थाने पूर्ण झालेला नाही. त्यांचा हेतू पूर्ण करण्यासाठी आम्हाला अद्याप खूप काम करायचे आहे, असे राज्यपाल पुढे म्हणाले.
मी कैलासात राहणारा आहे. तेथे शिवपार्वतीचा निवास आहे. तर गोव्यात विष्णुचा वास आहे आणि त्यांच्या सोबतीला लक्ष्मीही आहे. म्हणूनच हे छोटेसे राज्य असूनसुद्धा सर्व प्रकारे समृद्ध आहे, निसर्गसौदर्याने संपन्न आहे. येथील लोकांचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक आहे. ही समृद्धी कायम टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले.
कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे कार्यक्रमास मर्यादित लोकांनाच निमंत्रित करण्यात आले होते. मात्र संपूर्ण गोमंतकीयांसाठी हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांमध्ये सुलक्षणा सावंत, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री मायकल लोबो, गोविंद गावडे, मिलिंद नाईक, नीलेश काब्राल, जेनिफर मोन्सेरात, दीपक पाऊसकर, आमदार रवी नाईक, सुभाष शिरोडकर, प्रतापसिंह राणे, चर्चिल आलेमाव, सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर, एलिना साल्ढाना, दयानंद सोपटे, ज्योशुआ डिसोझा, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई यांची उपस्थिती होती.
प्रारंभी भांगराळे गोंय या संस्थेच्या कलाकारांतर्फे गोव्याची महती सांगणाऱया मनवेधक गीताने स्वागत करण्यात आले. शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागतपर भाषण केले. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर व डॉ. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख कार्यक्रमानंतर ‘गोंयचो गाज’ या सांकृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.