चन्नी अन् सिद्धू यांना प्रत्येक अडीच वर्षांसाठी प्रोजेक्ट करणार
पहिला कोण याचा निर्णय निवडून आलेले आमदार करणार
पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचदरम्यान पक्ष सेफ गेम खेळू पाहत आह. यात चरणजीत चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा केले जाऊ शकते. परंतु सरकार आल्यावर पहिला मुख्यमंत्री कोण याचा निर्णय निवडून आलेले आमदार करणार आहेत. पंजाब निवडणुकीत मतपेढीचे गणित पाहता काँग्रेस कुणा एकाचे नाव घेऊन जोखीम पत्करू इच्छित नाही.
पंजाबमध्ये काँग्रेस आज मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयाची घोषणा करणार आहे. राहुल गांधी लुधियाना येथील व्हर्च्युअल रॅलीद्वारे दुपारी 2 वाजता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयाची घोषणा करतील. या सभेचे पंजाबमधील 117 मतदारसंघांमध्ये थेट प्रसारण केले जाणार आहे.
चरणजीत चन्नींचे महत्त्व….
चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न केल्यास काँग्रेसला थेट स्वरुपात 32 टक्के दलित मतपेढीचे नुकसान होणार आहे. जर काँग्रेसने चन्नी यांची साथ सोडली तर दलितांमध्ये चुकीचा संदेश जाईल. यामुळे काँग्रेसने चन्नी यांना केवळ मते मिळविण्यासाठी कामचलाऊ मुख्यमंत्री केल्याचे मानले जाईल. काँग्रेस सध्या चन्नी यांच्या 111 दिवसांच्या कार्यकाळावरच मते मागत आहे. तर यापूर्वीच्या साडेचर वर्षांच्या सरकारचे नेतृत्व करणारे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपसोबत आघाडी केली आहे. चन्नी चेहरा नसल्यास काँग्रेस कुठल्या आधारावर मते मागू शकेल.
नवज्योत सिंह सिद्धू का महत्त्वाचे…
पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू हे काँग्रेसचे मोठे चेहरे आहेत. सिद्धू यांना पुढे करूनच काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले होते. उमेदवारी वाटपातही सिद्धू यांचाच वरचष्मा राहिला आहे. सिद्धू यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पंजाबमधील 19 टक्के जाट शिख मतपेढी दुरावणार आहे. पंजाबमध्ये केवळ दलितांनाच महत्त्व देत असल्याचा संदेश काँग्रेस देऊ इच्छित नाही. सिद्धू यांच्या नाराजीचा 69 जागा असलेल्या सर्वात मोठय़ा मालवा क्षेत्रात काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न घोषित केल्यास सिद्धू यांनी अचानक एखादे पाऊल उचलल्यास पक्ष अडचणीत येऊ शकतो. सिद्धू यांनी यापूर्वी पोलीस महासंचाल आणि ऍडव्होकेट जनरल यांना न बदलण्यात आल्याने राजीनामा दिला होता.
दलित अन् जाटशिख
काँग्रेससाठी पंजाबमध्ये दलित आणि जाट शिख मतपेढी आवश्यक आहे. हिंदू मतपेढी स्वतःकडे वळविण्यास काँग्रेसला अवघड ठरू लागले आहे. काँग्रेसचे मोठे हिंदू चेहरे सुनील जाखड प्रचारापासून दूर आहेत. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी 42 आमदार आपल्या बाजूने असूनही मुख्यमंत्री होता आले नसल्याची खंत व्यक्त केली होती. यामुळे काँग्रेसने केवळ हिंदू असल्याने जाखड यांना मुख्यमंत्री केले नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर शहरांमध्ये कॅप्टन आणि भाजप आघाडी हिंदू मतदारांना आकर्षित करू शकते. अशा स्थितीत चन्नी-सिद्धू यांच्या जोडीवर विसंबून राहणे काँग्रेसला भाग पडणार आहे.
काँग्रेसला होणारा लाभ
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पक्षत्याग केल्यावर काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत एखादा चेहरा पुढे करणे काँग्रेसाठी पायावर कुऱहाड मारून घेण्याचा प्रकार ठरणार आहे. आता अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानंतर सिद्धू आणि चन्नी स्वतःच्या समर्थक उमेदवारांना विजयी करण्यासाठी पूर्ण जोर लावतील. प्रथम कुणाला मुख्यमंत्री करावे याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे असणार आहे.