प्रतिनिधी/रत्नागिरी
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत मुख्यमंत्री ठाकरे यांचे आगमन झाले असून त्यांची कोव्हिड आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीस रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती आहे.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी, विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी मी कोकण वासियांना वाऱ्यावर सोडणार नाही, येत्या दोन ते तीन दिवसात नुकसान भरपाई जाहीर करणार असल्याची घोषणा केली.
तौक्ते चक्रीवादळाचा कोकणास मोठा फटका बसला आहे. तर, राज्यातील काही जिह्यांमध्येही या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन दिवसाचा कोकण दौऱ्यावर असून तेथील परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोस मदत करावी, अशी मागणी केली आहे.
यातच आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे ते या दौऱ्यात काही मोठी घोषणा करणार का? याकडे कोकणवासियांचे लक्ष राहणार आहे.