ऑनलाईन टीम / मुंबई :
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 44 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खे गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.
तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासानाकडून घटनेची माहिती घेणार आहेत.