ऑनलाईन टीम / मुंबई :
चिपळूणच्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि. 26) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच, महापुराने बाधितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावणीला भेट देत स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून, मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 10.45 वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून 11.30 वाजता त्यांचा कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल.
त्यानंतर 11.40 वाजता कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस ते भेट देऊन पूरग्रस्तांची संवाद साधतील. दुपारी 12.15 वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील. दुपारी 1.25 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.