सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीला मिळाले बळ
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आधारित पुस्तकाचे बुधवारी मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोवर हा प्रश्न सुटत नाही, तोवर संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करण्याची भूमिका मांडली. मागील अनेक वर्षांपासून सीमावासीय ही मागणी करीत असून मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे बेळगावमधून स्वागत करण्यात येत आहे.
सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी, यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. परंतु कर्नाटकातील सरकार मराठी भाषिकांवरचा अन्याय काही केल्या कमी करत नसल्याने हा भाग केंद्रशासित करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी देखील ही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे यापुढील काळात या मागणीचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सीमावासियांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
भविष्यात या भूमिकेसाठी लढा देणे गरजेचे -किरण गावडे-सरचिटणीस शहर म. ए. समिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत आहोत. यामुळे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला बळ मिळणार आहे. भविष्यात या भूमिकेसाठी लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांनी येत्या लोकसभा अधिवेशनात एकत्र येवून आवाज उठवावा. यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या विधानभवनात हा दोनवेळा ठराव मांडण्यात आला असून याचा पाठपुरवठा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्याय, अत्याचार कमी होण्यास मदत होणार -रेणू किल्लेकर-अध्यक्षा म. ए. समिती महिला आघाडी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुस्तक प्रकाशन सोहळय़ावेळी सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली. या भूमिकेचे बेळगावमधून स्वागत करण्यात येत आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, अत्याचार कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच याठिकाणी होणारी भाषिक गळचेपी रोखता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.