नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
सचिन वाझे प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी देखील वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.
संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतले. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते.
नारायण राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकर यांना वर्षभर चांगले काम करता आले नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे ही सचिन वाझे यांच्याकडे देण्यात आली होती. संबंध नसताना देखील ही प्रकरणे वाझेंकडे का देण्यात आली? असा प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माध्यमांकडून ‘सामना’च्या अग्रलेखाबाबत नारायण राणे यांना विचारण्यात आले. ‘सामना’द्वारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचे काम करत असल्याचे नारायण राणे सांगितले.