शिवसेना नेते संजय राऊत यांची ट्विटरवरून घोषणा
मुंबई / प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱयावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. ‘सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच ! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले.
राज्यात आता ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता 55 दिवस झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱयावर जाणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली.
गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर 15 जून 2019 रोजी उध्दव ठाकरे अयोध्या दौऱयावर गेले होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी 25 नोव्हेंबर 2018 रोजी उध्दव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. आता मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर आज मोठी घोषणा करण्याची शक्यता असतानाच राऊत यांनी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नसून उध्दव ठाकरे अयोध्या दौऱयावर जाणार असल्याची घोषणा केली आहे.