देवगड पं. स. सभेत सदस्यांची नाराजी : दोन महिने उलटूनही कामाच्या आदेशास विलंब
वार्ताहर / देवगड:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यामध्ये आठ रस्त्यांच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया होऊन आंदोलनानंतर निविदा खोलण्यात आली. ठेकेदारांना कामही देण्यात आले, तरीही या कामांना अद्यापही सुरू करण्याचे आदेश का दिले नाहीत. या योजनेचे पाणी नेमके कुठे मुरते? रस्त्यांची दयनिय अवस्था बनली असून दररोज अपघात घडतात. आता आदेशासाठी पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल का? असा प्रश्न माजी सभापती सुनील पारकर यांनी केला. तसेच वादळी पावसामध्ये शेतकऱयांचे नुकसान झाले त्या अहवालाचे नेमके काय झाले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. तालुक्यातील आठ रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा खुल्या करण्यासाठी दोन महिन्याचा विलंब खात्याकडून करण्यात आला होता. अखेर आठ गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर भाजपाच्यावतीने आम्ही निविदा खुल्या करण्यास भाग पाडले. निविदा खुल्या झाल्यानंतर कामाचा आदेश संबंधित ठेकेदारांना लेखीस्वरूपात देणे आवश्यक होते. मात्र, यालाही दोन महिने उलटून गेले तरीही कामाचा आदेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नेमके पाणी कुठे मुरते याचा शोध आता जनताच घेईल, असे मत श्री. पारकर यांनी व्यक्त केले. अवकाळी पावसामध्ये शेतकऱयांचे व आंबा बागायतदारांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत तालुका कृषी विभागाने कोणतीही पाहणी न करता नुकसान न झाल्याचा अहवाल दिला होता. प्रत्यक्षात शेतकरी आंबा बागायतदार यांचे नुकसान झाले होते. नजरअंदाजाने पाहणी करून कोणता शेतकरी आपले नुकसान झाले नाही, असे सांगत असेल तर त्या शेतकऱयाला समोर उभे करा. नजरअंदाजानेही पाहणी कृषी सहाय्यकांनी केलेली नाही. प्रत्यक्षात पाहणी करावी अशी मागणी श्री. पारकर यांनी कृषी अधिकारी श्रे. युलपे यांच्याकडे केली. मागील वर्षात कोरोनाच्या काळात आशा स्वयंसेविकांनी चांगले काम केले होते. त्यांना 1 हजार रूपये द्यावेत अशाप्रकारे आदेश होते. प्रत्यक्षात एकाही आशा सेविकेला ही रक्कम देण्यात आली नाही. याबाबत शासनाला पत्रव्यवहार करावा, अशी मागणी अजित कांबळे यांनी केली. तसेच आरे येथे बीएसएनएलची सेवा प्राप्त होत नाही. सध्या कोरोनाच्या साथीमध्ये गंभीर रुग्ण असेल तर त्याची माहिती देण्यासाठी कोणतीही सेवा नाही. तातडीने येथील सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. ‘माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी’ या अभियानातंर्गत कोरोनाच्या काळात खबरदारी घेण्यासाठी सर्वच यंत्रणेनी काम केले पाहीजे. गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी तेथील आशा सेविका यांना ऑक्सिमीटर, थर्मलगन व अन्य साहित्याचा पुरवठा ग्रामपंचायतीने करावा अशाप्रकारची माहिती गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली. वाघोटन-विजयदुर्ग रस्त्याची दुरावस्था झाली असून तातडीने या रस्त्याची डागदुजी करण्याची मागणी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर यांनी केली. सभापती श्री. पाळेकर यांनी विजयदुर्ग नळयोजनेला ठिकठिकाणी गळती असून त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी सूचना केली. त्यानुसार सोमवारी दुरूस्ती करण्यात येईल, अशी माहिती श्री. महाजनी यांनी दिली. कोविड लसीकरणामध्ये दुसरा डोस देण्याबाबत अनेक तक्रारी असून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मुदत उलटूनही त्यांना डोस प्राप्त होत नाही. मिठबाव केंद्रातच 884 लोक प्रतीक्षेत आहेत. अन्य तालुक्यातील आकडेवाडी पाहता हजारो लोक प्रतीक्षेत आहेत. याबाबत तातडीने पत्रव्यवहार करावा, अशी मागणी श्री. पारकर यांनी केली. आरे गावात रॅपिड टेस्ट करण्याची मागणी श्री. कांबळे यांनी केली.