पोफळी अन् कोयनानगरमध्ये चार तास सारेच तिष्टत
चिपळूण / प्रतिनिधी
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर गुरूवारी पोफळी आणि कोयनानगर येथे कार्यकर्ते, पत्रकार आणि निवेदने देण्यासाठी आलेल्यांची गर्दी झाली होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे आले, प्रकल्पाची पाहणी केली आणि आल्यापावली निघून गेले. त्यामुळे सकाळपासून चार तास तिष्ठत राहिलेल्यांची घोर निराशा झाली. मुख्यमंत्र्यांसह तब्बल पाच मंत्री, वरिष्ठ अधिकाऱयांचा तीन तासांचा दौरा नेमका कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी येणारे मुख्यमंत्री ठाकरे आणि नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांचे गुरूवारी सकाळी कोयनानगर येथील हेलीपॅडवर आगमन झाले. त्यानंतर ते सर्वजण नवजामार्गे कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्याकडे रवाना झाले. तेथील पाहणीनंतर ते कोयनानगर येथील शासकीय विश्रामगृहावर येऊन जेवण करणार होते. त्यासाठी या विश्रामगृहावर सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तही अधिक होता.
दुपारी 1 वाजता चौथ्या टप्प्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री कोयना धरणाच्या पाहणीसाठी गेले. त्यानंतर ते विश्रामगृहात येणार म्हणून अधिकाऱयांसह पोलीस यंत्रणेची लगबग सुरू झाली. मात्र धरणाकडून निघालेले मुख्यमंत्री थेट हेलीपॅडकडे व तेथून पुणेकडे रवाना झाले. त्यामुळे कोयनानगर येथे निवेदने देण्यासाठी थांबलेले शेतकरी संघटना, महिला कार्यकर्त्या, नागरिक यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांची निराशा झाली. विश्रामगृहावर नंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दौऱयाची माहिती दिली.
पोफळीतही गर्दी, चिपळुणात तयारी
चौथ्या टप्प्याच्या पाहणीदरम्यान पोफळी चेंबरीवर त्यांचे आगमन होईल अशी माहिती काहीनी दिल्याने या चेंबरीसह काहीठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र चौथ्या टप्प्यातून थेट ते धरणाकडे रवाना झाले. कोयनानगरप्रमाणेच चिपळुणातील पवन तलाव मैदानावरही हेलीपॅड उभारत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाहणी दौऱयात केवळ आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, राजन साळवी यांनाच सहभागी होता आले. त्यांच्या वाहनांतून आलेल्याना तसेच माजी लोकप्रतिनिधीलाही पोलिसांनी प्रवेश नाकारत गाडीतून खाली उतरवले.
साडेचारशे पोलिसांसह शंभर अधिकारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱयासाठी सातारा व रत्नागिरी जिल्हय़ातील सुमारे शंभरच्यादरम्यान पोलीस अधिकारी व साडेचारशेहून अधिक कर्मचारी पोफळी, कोयनानगर येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. बुधवारी दुपारनंतर या सर्वाच्या डय़ुटय़ा लावण्यात आल्या होत्या. मात्र एवढा मोठा बंदोबस्त ठेऊन मुख्यमंत्री आले तसेच निघून गेल्याने या दौऱयाचा नेमका उद्देश काय होता, असा सवाल दौऱयानंतर अनेकांनी उपस्थित केला.