बिहार विधानसभा निवडणुकीत ‘द प्लुरल्स पार्टी’च्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. स्वतःला मुख्यमंत्रिपदाची उमेदवार ठरविणाऱया प्लुरन्स पार्टीच्या पुष्पम यांना निवडणुकीत मात्र दारुण पराभव पत्करावा लागला आहे. पुष्पम यांना बिस्फी मतदारसंघात केवळ 669 मते मिळाली आहेत. तर बांकीपूर मतदारसंघात 1,272 मतेच प्राप्त करता आली आहेत. बिस्फीत राजदच्या उमेदवारने विजय मिळविला आहे. तर बांकीपूरमध्ये पुष्पम यांच्यासह शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे.
पुष्पम यांचा आरोप
पुष्पम यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने फेरफार केल्याच आरोप केला आहे. सलग 6 ट्विट करून प्लुरल्स पार्टीची मते भाजपने स्वतःच्या बाजूने वळविल्याचा दावा केला आहे. ईव्हीएम हॅक करून पक्षाची मते चोरली आहेत. कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर आत जाऊन मतदान केले, त्या केंद्रांमध्येही मला शून्य मते मिळाली आहेत. सत्तारुढ आघाडीने फेरफार केला असून आमच्या पक्षासोबत अन्याय केल्याचे पुष्पम यांनी म्हटले आहे.
हायप्रोफाईल मतदारसंघ ‘बांकीपूर’
पाटण्यातील हायप्रोफाइल मतदारसंघ बांकीपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन नवीन विजयी झाले आहेत. तर शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र तसेच पुष्पम चौधरी यांना मोठा पराभव झाला आहे. पुष्पम या संजदचे माजी खासदार विनोद चौधरी यांच्या कन्या आहेत.
प्रसिद्धीतंत्र
वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन चर्चेत आलेल्या पुष्पम प्रिया यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते. त्या समाजमाध्यमांवरही सक्रीय आहेत. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने स्वच्छ प्रतिमा असलेले सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार आणि अन्य पेशाच्या लोकांना मैदानात उतरविले होते. मूळच्या दरभंगा येथील रहिवासी असलेल्या पुष्पम यांनी लंडनच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात मास्टर्सची पदवी प्राप्त केली आहे.
ग्रामीण भागात रालोआ वरचढ शहरी क्षेत्रात मात्र नुकसान :
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआने पुन्हा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यास यश मिळविले आहे. राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात रालोआला लाभ तर शहरी क्षेत्रात किंचित नुकसान झाले आहे.
बिहारच्या ग्रामीण क्षेत्रात 223 मतदारसंघ आहेत, तर शहरी क्षेत्राच्या अंतर्गत केवळ 20 मतदारसंघ येतात. ग्रामीण क्षेत्रात रालोआला 2 जागांचा लाभ झाला आहे. भाजपने ग्रामीण क्षेत्रातील 60 मतदारसंघांमध्ये यश मिळविले आहे. यंदा भाजपला ग्रामीण क्षेत्रात 21 जागांचा लाभ झाला आहे. परंतु ग्रामीण क्षेत्रात संजदला मोठा झटका बसला आहे.
ग्रामीण क्षेत्रात संजदला 23 जागांचे नुकसान झाले आहे. यंदा रालोआत सामील असलेल्या व्हीआयपीला 4 जागांचा लाभ झाला आहे. जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षालाही एका मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर ग्रामीण क्षेत्रात महाआघाडीला 5 जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे. महाआघाडीला ग्रामीण क्षेत्रातील 99 जागांवर विजय मिळाला आहे.
शहरी क्षेत्रातील स्थिती
बिहारमध्ये शहरी क्षेत्रात 20 विधानसभा मतदारसंघ मोडतात. यात रालोआला नुकसान तर महाआघाडीला लाभ झाला आहे. भाजपला 7 मतदारसंघांमध्ये विजय मिळाला आहे. तर महाआघाडीला एका जागेवर यश मिळाले आहे.
भाजपमधून मुख्यमंत्रिपदाच्या मागणीचे उमटले सूर
बिहारमध्ये एक्झिट पोलच्या अनुमानांच्या उटल मतमोजणीत मिळालेल्या आघाडीने उत्साहीत भाजपमध्ये आता स्वतःचा मुख्यमंत्री करण्याची मागणी उपस्थित होऊ लागली आहे. तर कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्रिपदावरून बिहारमध्ये नवा वाद उभा राहण्याची भीती संयुक्त जनता दलाला सतावू लागली आहे. याचमुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावरच रालोआला मते मिळाल्याचे संजदचे नेते म्हणू लागले आहेत.
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असावा अशी मागणी सर्वप्रथम भाजप अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष अजीत चौधरी यांनी केली आहे. आकडेवारीच्या दृष्टीकोनातून बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री असावा. दीर्घकाळापर्यंत एखादा व्यक्ती मुख्यमंत्री असल्यास त्याच्या विरोधात काही प्रमाणात सत्ताविरोधी भावना असते. बिहार निवडणुकीचा निकाल पाहिल्यास जनमत भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
चौधरी यांचे हे वैयक्तिक विधान असू शकते, निश्चितपणे ही पक्षाची भूमिका नाही असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच होणार असल्याचे जाहीर केल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश हेच होतील याबद्दल कुणीच संशय बाळगू नये असे शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
कमी जागा मिळाल्यावरही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपच्या सर्व नेत्यांनी यापूर्वीच घोषित केल्याचा दावा संजद नेते के.सी. त्यागी यांनी केला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नावावरच मते पडली आहेत. बिहारमध्ये रालोआचे नेतृत्व नितीश कुमार तर देशात पंतप्रधान मोदी करत असल्याचे उद्गार संजदचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी यांनी काढले आहेत.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासंबंधी भूमिका स्पष्ट केली असल्याने यावरील चर्चा निरर्थक असल्याचे संजद नेते अजय आलोक यांनी म्हटले आहे.