भूपेश बघेल पोहोचले राहुल गांधींच्या भेटीला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थान आणि पंजाबनंतर आता छत्तिसगडमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. अलीकडेच, छत्तीसगड सरकारमधील मंत्री टी. एस. सिंहदेव यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही शुक्रवारी दिल्लीत धाव घेत राहुल गांधींसमोर राज्यातील कैफियत मांडली. तसेच भूपेश बघेल यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत.
छत्तिसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शुक्रववारी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ‘मी राहुलजींना राज्यात आमंत्रित केले असून ते पुढील आठवडय़ात छत्तिसगडमध्ये झालेली विकासकामे पाहतील’, असे बघेल यांनी राहुल गांधींसोबत केलेल्या चर्चेनंतर स्पष्ट केले. तसेच राजकीय विषयांबरोबरच राज्यातील प्रशासकीय बाबींवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदासंदर्भात अडीच वर्षांच्या सूत्राबद्दल विचारले असता यासंबंधी पक्षनेतृत्त्व निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बदलाला विरोध
राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर भूपेश बघेल यांच्या गटाचे मंत्री आणि 53 आमदार आधीच दिल्लीला पोहोचले आहेत. बघेल गटाच्या अनेक आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. डझनहून अधिक आमदारांनी गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेसचे छत्तिसगड प्रभारी पी. एल. पुनिया यांची भेट घेतली. बघेल समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री बदलाला विरोध केला आहे. बघेल गटाचे आमदार राज्यातील सरकारमधील नेतृत्व बदलाच्या विरोधात आहेत.