माकपचे नरसय्या आडम यांची टिका
प्रतिनिधी / कोल्हापूर
पूरपरिस्थिती पाहण्यासाठी सांगली दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी समाजात विष पेरणार्या संभाजी भिडे यांना भेटले. हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून ठाकरे यांनी घेतलेली ही भेट एक्षित नव्हती, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव माजी आमदार नरसय्या आडम यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
कोरोनाशी वैज्ञानिक दृष्टीने दोन हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारी विधाने करणार्या संभाजी भिडे यांची भेट घेणे अत्यंत खेदजनक आहे. या आणि इतर विधानांनी हे विद्याविरोधी गृहस्थ अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वारंवार आव्हान देत आले आहेत. 2018 मध्ये भीमा-कोरेगाव येथे दलित आणि दलितेतर समाजात वितुष्ट निर्माण करून सामाजिक सौख्याचे पालन करणार्या महाराष्ट्र धर्माला भिडे यांनी चूड लावली. या एकाच गुह्यासाठी त्यांची भीमा-कोरेगावच्या नजीकच असलेल्या येरवडा तुरूंगात रवानगी करायला पाहिजे होती.
महाराष्ट्रातील तुरूंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आश्वासन दिले, हे जनतेला समजले पाहिजे. खरे तर याबद्दल भिडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे. सांगली दौर्यावर असताना नरेंद्र मोदींनी या विद्याविरोधकाचे पाय धरले होते. मुख्यमंत्री-भिडे भेटीत नेमके कुणी कुणाचे पाय धरले, हे समजायला हवे. तर भाजपच्या देवेंद्र फडणविसांचाच अजेंडा उद्धव ठाकरे राबवणार नाहीत, आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाशी प्रतारणा करणार नाहीत, अशी अपेक्षा नरसय्या आडम यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.