ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील प्रश्नांबाबत जाऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे विधान काही दिवसांपुर्वी संजय राऊतांनी केले होते. त्यातच आता चक्क शिवसेनेच्या एका नेत्यानेच आता मुख्यमंत्र्यांआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतली.
राज्यपालांनी विशेषाधिकार वापरत विदर्भ – मराठवाड्याला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी किशोर तिवारींनी केली. पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत अपुरी आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असल्याचे तिवारी म्हणाले. तिवारी हे गेले काही दिवस मुंबईत आहेत. पण वारंवार मागणी करुनही त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यानंतर संजय राऊतांनी टीका करत मुख्यमंत्र्यांआधी राज्यपालांची भेट घेणे हा राज्याचा अपमान असल्याचे म्हटले होते. पण आता तिवारींनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीनंतर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.