बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी भाष्य करताना केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी असे सांगितले की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय नेते यांच्यात झालेल्या चर्चेचा विषय आपल्याला माहिती नाही आणि त्यांच्यापैकी कोणीही ‘मुख्यमंत्री बदल’ या मुद्दयाबद्दल बोलले नाही.
मंत्री जोशी यांनी, “राज्याच्या राजकारणाबद्दल मला जे काही माहित आहे ते केवळ माध्यमांद्वारेच आहे, आणि येडियुरप्पा किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करण्यास अधिकृत व्यक्ती नाही,” असे ते म्हणाले.
येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे की नाही हे मला माहिती नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांनी निर्णय घेणे बाकी आहे. त्यामुळे मौख्यमंत्री पदासाठी कोण आघाडीवर असा प्रश्नच नाही.जोशी यांनी नमूद केले. तसेच हा विषय माझ्याशी संबंधित नाही” असे म्हणाले आणि त्यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्याच्या मागणीवर भाष्य करण्यास नकारही दिला.
तसेच राज्याचे मोठे व मध्यम उद्योग मंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, येडियुरप्पा यांच्यासाठी पक्षाच्या नेतृत्त्वातून कोणता संदेश येईल आणि याबाबत काहीच स्पष्टीकरण नाही. ते म्हणाले, “मला या विषयाची माहिती नाही, कारण पक्षाचे केंद्रीय नेतृत्व माझ्याशी बोलले नाही. मी उद्योग खात्याशी संबंधित कामांसाठी गुजरात आणि दिल्लीला भेट दिली आणि त्याच उद्देशाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली.”
प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे की वादग्रस्त ऑडिओ क्लिपमधील आवाज हा त्यांचा नाही आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे शेट्टर यांनी सांगितले.