प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला. प्रकरण ‘पॅच-अप’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनने एक पत्रक जारी केले असून कोविड 19 च्या संकटात राज्यपाल सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे, तर राज्यपालांच्या सूचनांचे पालन केले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेल्या माहितीनंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले होते. प्रसिद्धी माध्यमे चुकीची माहिती पुरवितात, असे राज्यपालांनी म्हटल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यपालांनी प्रसिद्धी माध्यमांबाबत आपण काहीही बोललेलो नाही व मुख्यमंत्र्यांनी चुकीचे विधान केल्याचे म्हटले होते. या विषयावरून राज्यात सरकारच्या कामगिरीचा व मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा पंचनामा झाला. त्यानंतर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यात चर्चा झाली व प्रकरणावर पडदा पडला.