ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव बैठका, कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने विरोधक वारंवार टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री किंवा इतर कोणाकडे पदभार द्यावा अशी मागणी विरोधक हिवाळी अधिवेशनापासून करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजरोहण आणि त्यानंतर शिवाजी पार्कात उपस्थिती लावली होती. यानंतर त्यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या थीम गाण्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
दरम्यान यावेळी त्यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठिंबा आभासी नाही. पाठिंबा प्रत्यक्ष असणार आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना उत्तर दिलं. “आभासी पद्धतीने मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख मी दोन, तीन वेळा ऐकला. पण आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठिंबा आभासी नाही. पाठिंबा प्रत्यक्ष असणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.
पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी, मुंबई पोलिसांचं कौतुक करावं तितके कमी आहे. मला अभिमान आहे पोलिसांचा. या क्षेत्रात महिला देखील कुठेही कमी नाहीत. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीसांचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय पोलिस पदकांची काल घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला. राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके’, सात जणांना ‘पोलिस शौर्य पदके’ आणि प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलिस पदके’ जाहीर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडून पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
तसेच “प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून कौतुक वाटावं असं काम आपण करत आहोत याचा अभिमान आहे. मी गृहमंत्र्यांचे आभार मानतो. महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. प्रश्न इतकाच आहे की, एका बाजूने महिला प्रगतीपथावर घोडदौड करत असताना समाजातील महिला असहाय्य आहेत. एखादी घटना घडली तर काही दिवस गोंधळ होतो आणि नंतर पुन्हा परिस्थिती शांत होतं. ही परिस्थिती कोणामुळे आणि कशामुळे निर्माण होते इतकीच चर्चा होते. पण अशा घटना घडू नयेत यासाठी आणि घडत असतील तर तिथल्या तिथे त्या आरोपींचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करणारी यंत्रणा आपल्या राज्याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरु केली हे अभिनामानाचं काम आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.