काँगेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत मांडलेला 2022-23 चा अर्थसंकल्प म्हणजे आधीच्या अर्थसंकल्पाची प्रतिकृती (कॉपी) असल्याची टीका काँगेंसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी केली आहे. मागील 2021-22 मधील अर्थसंकल्पातील 44 टक्के घोषणांची अंमलबजावणी झाली तर 56 टक्के घोषणांची कार्यवाही झाली नसल्याचे सरकारच्याच अहवालावरून त्यांनी निदर्शनास आणले.
पर्वरी विधानसभा संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार कामत यांनी सांगितले, की राज्यपालांचे अभिभाषण व डॉ. सावंत यांचे अर्थसंकल्पातील भाषण जवळपास सारखेच आहे. मागील अर्थसंकल्पात (2021-22) सावंत सरकारने 252 घोषणा केल्या होत्या. त्यातील 111 घोषणांची कार्यवाही झाली. बाकीच्या तशाच कागदावर आहेत. फ्ढक्त 33 टक्के मते घेऊन सत्तेवर आलेल्या सावंत सरकारच्या या अर्थसंकल्पात कोणत्याही योजनांचा, प्रकल्पांचा समावेश नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे आधीच्या अर्थसंकल्पाचे ‘मिक्सिंग’ असल्याची खिल्ली कामत यांनी उडवली आहे. ऑनलाईन शिक्षण साधन सुविधा यावर अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही. सरकार लोकांच्या दारी ऐवजी पाणी लोकांच्या दारी नेण्याची गरज कामत यांनी वर्तविली आहे.