प्रतिनिधी / बेळगाव
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे प्रचारासाठी बेळगावमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी रामदुर्ग तालुक्मयातील सालहळ्ळी येथे प्रचारसभा घेऊन काँग्रेसवर घणाघाती आरोप केला. काँग्रेस म्हणजे बुडती नाव आहे. राज्यात भाजपचे 25 खासदार आहेत. काँग्रेसचा केवळ एकच खासदार आहे, असे सांगून त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली.
भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना विजयी करून पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून बेळगावच नाही तर संपूर्ण राज्यात त्यांनी विकासकामांसाठी प्रयत्न केले. यासाठी मोठा निधी आणला. त्यांचे काम अर्धवट आहे, ते पूर्ण करायचे असून त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयांमध्ये त्यांनी प्रचार केला. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जो विकास केला आहे तो गेल्या 70 वर्षांत काँग्रेसला करता आला नाही. तरीही काँग्रेस खोटे आरोप करत आहे. भाजप सरकार गोरगरीब, शोषित आणि मागासवर्गीयांचे सरकार आहे. कोविडसारख्या भयानक संकटाच्या काळातही पंतप्रधान मोदी यांनी जी परिस्थिती हाताळली आहे, त्याबद्दल जगाने त्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी मंत्री जगदीश शेट्टर यांनीही काँग्रेसवर टीका करून मोदींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला मतदान करावे, असे आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे सुरेश अंगडी यांचे कार्य पाहूनच त्यांच्या पत्नीला यावेळी मतदान करा, आणि त्यांना निवडून आणा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही काँग्रेसवर टीका करून भाजपने केलेले कार्य सांगितले.
या सभेला भाजपचे आजी-माजी आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची सभा असल्यामुळे रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयांतील भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. भर उन्हामध्ये प्रचारफेरी काढून त्यांनी हे आवाहन केले आहे.