‘सीझेडएमपी’ प्रश्नावर गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका
प्रतिनिधी / मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कोळसा आणि दिल्ली लॉबीला मदत करणाऱया एजन्सीने तयार केलेला सीझेडएमपी त्वरित मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फटकारले आहे. सरदेसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांची घाई त्यांच्या गोमंतकीयविरोधी धोरणांचे सूचक आहे आणि त्यांचे सरकार गोव्याला संपूर्णपणे विकायला कटिबद्ध आहे हे सिद्ध होते.
सरकारने संबंधित क्षेत्रातील पंचायतींसारख्या स्थानिक स्वराज संस्थांनी सादर केलेले मसुदे आधी स्वीकारले पाहिजेत आणि त्यानंतरच जनसुनावणी घ्यायला हवी. गोव्याच्या प्रश्नांवर गोमंतकीय तोडगे आवश्यक आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गोव्याच्या बाहेरून येणाऱया एजन्सी स्थानिक लोकांच्या दृष्टीने सर्वोत्तम तोडगा काढण्यास इच्छुक नसतात, तर त्यांचे केवळ ग्राहक गोवा सरकारला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न राहतात. जर सरकार सीझेडएमपीचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत खरोखरच गंभीर असते, तर त्यांनी गोव्याबाहेरील काही सल्लागारांचे म्हणणे ऐकण्याऐवजी स्थानिक स्वराज संस्था आणि समुदायांबरोबरच सल्लामसलत केली असती, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
गोवा फॉरवर्ड पार्टी सीझेडएमपीच्या सुनावणीच्या विरोधात नाही. परंतु सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे तयार करण्यात आलेले मसुदे आधी सामील केले पाहिजेत आणि नंतरच जनसुनावणी घ्यायला हवी. सरकारचा सध्याचा दृष्टिकोन किनारपट्टी भागात राहणाऱया स्थानिक मच्छीमार समुदायाची उपजीविका उद्धवस्त करण्याचा दिसतो. जेव्हा या सीझेडएमपीवर पारंपरिक मासेमारी विभाग देखील योग्य प्रकारे दर्शविले जात नाहीत तेव्हा गोव्याचे आणि गोव्याच्या हिताचे हे सरकार कसे संरक्षण करेल, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.
सरकार सत्तेच्या नशेत
भाजप सरकार पूर्णपणे सत्तेच्या नशेत आहे आणि ते आपल्या इच्छेनुसार काहीही करू शकतात. आपले राज्य, आपले लोक आणि आपले जीवनमान ते उद्धवस्त करत आहेत. मुख्यमंत्री गोव्याला कोळशाचे केंद्र बनवण्यासाठी वावरत आहेत आणि सध्याचे सरकार कोळसा आणि दिल्लीची लॉबी म्हणून काम करत आहे. प्रमोद सावंत यांच्या कारभारात प्रशासन नाही, केवळ लॉबिंग आणि डील्स आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.
सरदेसाई यांनी गोव्याला वाचवण्यासाठी आणि गोव्याला पुन्हा रूळावर आणण्याच्या दिशेने काम केलेल्या सर्व गोमंतकीयांना पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. जनता भाजपाला कंटाळली आहे आणि मुख्यमंत्री दिवस मोजत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या भाजप सरकारचा असा समज आहे की, त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने ते काहीही करु शकतात. परंतु आम्ही त्यांना आपले राज्य आणखी खराब करू देणार नाही. गोव्यातील लोक आपली जमीन वाचवण्यासाठी उठतील आणि सरकार उघडे पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.