मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे एच पश्चिम महानगरपालिका विभाग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यालयाचा वापर गेल्या ३ महिन्यांपासून प्रशासकीय कामांसाठी करण्यात येत असल्याचा खुलासा वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. यामुळे श्रेय घेण्यासाठी हे उद्घाटन करण्यात आलं का असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
भाजप आमदार आशिष शेलार नियोजित दौऱ्यावर असल्यामुळे या महानगरपालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनाला उपस्थिती राहू शकले नाही. मात्र एक व्हिडिओ ट्विट करत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची फसगत करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, एच पश्चिम महानगरपालिका विभाग कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. पण हे कार्यालय वापरामध्ये ३ महिन्यांपुर्वीच आले आहे. जे कार्यरत सेवेत कार्यालय आहे. त्या कार्लायलाचं कार्यक्रमाच उद्घाटन करुन सेवेत कार्यरत करण्याचे कारण काय आणि त्याच्या मागचा अट्टहास काय आणि मग विषय अट्टहासाचा आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये बसलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांना फसवत आहेत असा माझा अट्टहास असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. स्थानिक आमदार, एएलएम, संस्था, नागरिकांची मागणी आणि पाठपुराव्याने ही नवी अद्ययावत इमारत उभी राहिली. 1 मे पासून ती लोकांसाठी खुलीही करण्यात आली. आता अचानक 3 महिने वापरात असलेल्या इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे असंही आशिष शेलार यांनी नमूद केले.