प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील अनेक सरकारी कार्यालये भाडोत्री जागेमध्ये सुरू आहेत. कोरोनामुळे सरकारला भाडे देणे अशक्मय होत आहे. त्यामुळे आता भाडोत्री जागेमध्ये सुरू असलेली सरकारी कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करावीत, असा आदेश देण्यात आला आहे. जवळपास 24 कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
सुवर्णसौधमध्ये नुकताच माहिती आयोग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर या ठिकाणी विविध कार्यालये स्थलांतरित करावीत, असा आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला होता. त्यानुसार आता काही कार्यालये स्थलांतरित करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.
जिल्हा रोजगार विनिमय, भूवैज्ञानिक सहकारी संस्था, कौशल्य विकास विभाग, लेख परीक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बाल विभाग, सहकार विभाग, देवराज अर्स, महषी वाल्मिकी अनुसूचित वर्ग, हॅण्डलूम टेक्स्टाईल विभाग, डॉ. बी. आर. आंबेडकर विकास महामंडळ, पाणीपुरवठा विभाग, मागासवर्गीय महसूल विभाग, गृहनिर्माण विभाग, पर्यटन विभाग, पाटबंधारे महामंडळ, बेळगाव प्रक्रिया सहकारी संघ अशी एकूण 24 सरकारी कार्यालये येथे हलविण्यात येणार आहेत.