वाळपई प्रतिनिधी
होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सोलये खनिज खाणीवरील वाहतुकीला विरोध असतानाही सदर कंत्राटदाराने जबरदस्तीने वाहतूक सुरु केल्यानंतर आज संध्याकाळी एका दुचाकीचा अपघात झाल्यामुळे नागरिकांत संतापाची भावना उमटली असून रात्री उशिरापर्यंत मोठय़ा प्रमाणात सदर गावातील नागरिक याच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते .
भागातील नागरिकांच्या मागण्या प्रलंबित असतानाही सदर कंत्राटदाराने जबरदस्तीने वाहतूक सुरू केलेली आहे. यामुळे गेल्या आठ दिवसापासून नागरिक आक्रमक बनले आहेत. याबाबतची माहिती अशी की होंडा ग्रामपंचायत येणाऱया सोलये येथील खनिज मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न कंपनीकडून गेल्या दोन महिन्यापासून करण्यात येत होता. मात्र नागरिकांनी आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत खनिज मालाची वाहतूक सुरू करू देणार नाही. अशा प्रकारचा निर्धार केला होता. या संदर्भात निवेदने सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी व पोलिस स्थानक सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर केले होते. याची दखल घेऊन अनेक वेळा उपजिल्हाधिकारी यांच्या समवेत या संदर्भात बैठक झाली .
या बैठकीमध्ये कत्रांटदाराने सर्व प्रकारच्या मागण्या मान्य करणार असल्याचे सांगून अनेकवेळा आपला शब्द फिरविल्यामुळे नागरिक सदर कंत्राटदार विरोधात तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करीत आहेत. यासंदर्भातील तक्रार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती .त्यांनी कंत्राटदाराला नागरिकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत खनिज मालाची वाहतूक सुरू करू नये अशा प्रकारचा आदेश दिला होता. असे असतानाही या कंत्राटदाराने डॉक्टर प्रमोद सावंत यांचा आदेश धुडकावून ही वाहतूक सुरू केलेली आहे .यामुळे या भागांमध्ये तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे .
गेल्या चार दिवसांपासून या वाहतुकीला सुरुवात झालेली आहे. त्या दिवसापासून नागरिक ही वाहतूक अडवून आपला निषेध व्यक्त करीत आहेत. असे असतानासुद्धा स्थानिक पोलिस बळाचा वापर करून या कंत्राटदाराला ही वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. या चार दिवसापासून या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आज संध्याकाळी या चिखलातून जात असताना गावातील एक दुचाकी चालक पडून तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला व रात्री उशिरापर्यंत मोठय़ा प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले होते. सध्यातरी ही वाहतूक नागरिकांनी बंद केली असून उद्यापासून या वाहतुकीला पूर्णपणे विरोध करण्यात येईल अशा प्रकारचे निर्णय नागरिकांनी घेतल्याचे समजते. याबाबत नागरिकांची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कंत्राटदार जबरदस्तीने ही वाहतूक करीत असून व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सुशांत गावडे हा युवक सदर भागातून होंडा याठिकाणी जात असताना या चिखलमय रस्त्यामध्ये तो पडल्यामुळे जखमी झाला आहे. त्याच्या गाडीची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली असून अशा अवस्थेत होणारी खनिज मालाची वाहतूक ताबडतोब बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.