मंगळवारपर्यंत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या पाच दिवसांपासून एसीजीएल कंपनीचे कामगार संपावर होते. आज शेवटचा दिवस होता. गेल्या चार दिवसांत कामगार बांधवांनी वेगवेगळय़ा शहरात मोर्चा काढल्यानंतर शेवटी सरकारला याची दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारपर्यंत तोडगा काढण्याची, अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी कामगारांनी संप स्थगित केला.
मंगळवार पर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीने तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. तसे न झाल्यास कामगार संघटना पुढील कृती निश्चित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कामगार संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन करून मंगळवारपर्यंत वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. भुईपाल सत्तरी येथील येथील कामगार संघटना गेल्या पाच दिवसांपासून संपावर आहे. 18 ऑक्टोंबरपासून हा संप सुरू आहे. पहिले दोन दिवस कंपनीच्या परिसरात संप केल्यानंतर तिसऱया दिवशी वाळपई शहरात तर चौथ्या दिवशी साखळी शहरांमध्ये मोर्चा काढून जनतेचे लक्ष वेधले. सदर मोर्चाला विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे सरकारसमोर दबाव निर्माण होऊन शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेऊन स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
आज संपाच्या शेवटच्या दिवशी संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी यासंदर्भात कामगारांशी संवाद साधला, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मंगळापर्यंत पगार वाढ व अन्य मागण्या व आशादायी निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत संप स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन त्याला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
कामगारांची एकजूट कौतुकास्पद : मनोज चव्हाण
कामगार संघटनेचा हा संप गोव्याच्या कामगार इतिहासातील विशेष नोंद घेणारा ठरला आहे. कामगारांची एकजूट ही खरोखरच कौतुकास्पद असून एकजुटीची वज्रमूठ भविष्यात अशाच प्रकारे कायम ठेवून कामगारांनी आपल्यावर होणाऱया अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी मनोज चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेने अनेक संप मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. गोव्यातील एसीजीएल कामगार संघटनेने पुकारलेला संप या संघटनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. यापुढेही कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी लवकरच यासंदर्भात बैठक होणार आहे. एकाही कामगारावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार असून मंगळवारपर्यंत मध्यस्थी करून व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर हा मुद्दा निश्चितच सुटेल अशी आशा कामगारांनी व्यक्त केली.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी कोकण रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष पी शिवनाथन यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या संघटनेचा या कामगारांना आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान गेल्या तीन दिवसांत काँग्रेस पक्षाचे दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, शिवसेनेचे जितेश कामत, गुरुदास गावकर, सामाजिक कार्यकर्ते गणपत गावकर व इतरांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.