प्रतिनिधी / सांगली
सांगली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. निवेदने देण्यावरून हा गोंधळ झाला आणि प्रचंड घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या गाडÎांचा ताफा घटनास्थळावरून हलविला. दरम्यान, निवेदने स्वीकारली नसल्याचे नमूद करत भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत चौकातच ठिय्या मारला. या प्रकाराने पोलिसांची मात्र पळापळ झाली. कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तर काही पोलिसांनी पत्रकारांनाच धक्काबुक्की केली.
मुख्यमंत्री प्रारंभी मारूती चौकात येणार होते. तथापि कसबे डिग्रज, आयर्विन पुलाची पाहणी करून हरभट रोडने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गारमेंट चौकातच विविध राजकीय पक्ष, संघटना व व्यापारी यांना निवेदने देण्याबाबत मुख्यमंत्री वेळ देणार असल्याचे सांगितले.
तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणेंसह नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, अमर पडळकर, दीपक माने, नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासह कार्यकर्त्या तर दुसऱया बाजूला शिवसेनेचे प्रसाद रिसवडे, शंभोराज काटकर, अनिल शेटे, सुजाता इंगळे यांच्यासह कार्यकर्ते निवेदने घेवून उभे होते. तिथे समीर शहा व व्यापारीही निवेदन देण्यासाठी आले. मुख्यमंत्री येण्यापूर्वी पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी चौकाच्या चारीही बाजूनी मोठा दोरखंड बांधून चौक जाम केला. येथे काही तरी होणार याबाबत पोलिसांनीही काहीशी कल्पना आल्यामुळे ते सावध होते.
मुख्यमंत्री ठाकरे बॅरीकेटच्या दिशेला गेल्यावर निवेदने देण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यांच्यासमवेत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीताराम पुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार र्धेर्यशील माने हेही होते. निवेदने देताना गोंधळ सुरू झाला. या गोंधळात मुख्यमंत्र्यांनी निवेदन व म्हणणे ऐकले नाही म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सेनेच्या कार्यकर्त्यांनीही `कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा सुरु केल्या. गोंधळ वाढू लागल्याने पोलिसांना घाम फुटण्याची वेळ आली. धामणीचे विठ्ठल पाटील राष्ट्रीय महामार्गाबाबत निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे पळत सुटल्याने एकच पळापळ झाली. पोलिसांनी खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांना तत्काळ गाडीत बसवले व सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना केला.
मुख्यमंत्री गेल्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिली. दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जावू लागले. त्यामुळे तणाव निर्माण झाला.भाजपने चौकातच ठिय्या मारल्याने येथील वाहतूकही ठप्प झाली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत कार्यकर्त्यांना पांगविले. मुख्यमंत्र्यांनी दौऱयाचा केवळ फार्स केला असून व्यापारी व पूरग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता ते निघून गेले, असे नमूद करत भाजपने मुख्यमंत्र्यांचा निषेध केला तर भाजपने ठरवून हा गोंधळ घातल्याचा आरोप सेनेने केला.