बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यामध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अनेक धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र असं असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. व्हाय. विजयेंद्र यांनी नियमांचं उल्लंघन करत नांजुनागुड येथील श्रीकंटेश्वरा मंदिराला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि नेत्यांसाठी एक नियम का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्रांचे पुत्र विजयेंद्रा यांनी मंगळवारी आपल्या पत्नीसहीत या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. कर्नाटकमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवासावर बंदी घातली आहे. राज्यात कोरोनाचा वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन धार्मिक स्थळं आणि मंदिरंही बंद ठेवण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच १० मे ते २४ मे दरम्यान राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली होती. “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातलं आहे. निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. मृतांचा आकडा वाढत चालला आहे. दरम्यान, “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये १० मे पहाटे सकाळी सहा वाजल्यापासून ते २४ मे सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे.” पूर्ण लॉकडाऊनची घोषणा खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली असतानाही मुख्यमंत्र्यांचा मुलगा पत्नीसहीत देवदर्शनाला गेल्याने सर्वसामान्यांसाठी एक नियम आणि राजकारण्यांसाठी वेगळा नियम आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, पब्स, बार बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा येडियुरप्पांनी केली होती. मात्र त्याचसोबत अन्नधान्य, औषधं, दूध, भाजीपाला, फळं यासारखी दुकानं सकाळी सहा ते दहा कालावधीमध्ये सुरु ठेवण्यातआली आहेत. राज्याचे मुख्य सचिव रवी कुमार यांनी आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांना निर्बंध लागू नसतील असं स्पष्ट केलं होतं. तसेच आरोग्य यंत्रणेशीसबंधित सामुग्रीची ने-आण करण्यांनाही नवे निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. केंद्र आणि राज्याच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या आपत्कालीन सेवांमधील कर्मचाऱ्यांना सूट देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होत.