प्रतिनिधी / उस्मानाबाद
अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या जमिनी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्यशासनाने तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज मदत म्हणून जाहीर केले त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही अतिशय तोकडी मदत असून हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची त्यांनी मागणी केली होती. आता ते राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळावा. त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यास मोठी संधी असून त्या संधीचं त्यांनी सोनं करावं अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२० ऑक्टोबर रोजी केली.
येथील शासकीय सरकू सर्किट हाऊसवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून कापून ठेवलेली व काढणीस आलेल्या पिकांचे भयानक नुकसान झालेले आहे मी बारामतीपासून नुकसानी पिकांची पाहणी करीत असून शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून काही ठिकाणी तर प्रशासन देखील पोहोचलेले नाही या अतिवृष्टीत गुरंढोरं मृत पावले असून अनेकांचा संपर्क तुटल्यामुळे त्यांना दोरीच्या सहाय्याने प्रवास करावा लागत आहे.
जमीन खरडून गेल्यामुळे त्यांनी पुन्हा शेती कशी करायची हा प्रश्न देखील अतिशय गंभीर आहे त्यासाठी शासनाने विशेष योजना तयार करावी शेतकऱ्यांना मदत गेली पाहिजे त्यांच्या विहिरीतील गाळ उपसण्यासाठी मदत करण्याबरोबरच विद्युत पंप व पाईपलाईन साठी देखील मदत करणे आवश्यक आहे या आपत्तीत उसाबरोबर कांदा मका व फळबागांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक विमा कंपनी वर दबाव आणणे गरजेचे आहे तरच शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडू शकेल शासनाने तात्काळ पंचनामे संपवली पाहिजेत मोबाईल फोटो आहात पंचनामा समजून त्यास मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना ४-५ हजार रुपये मदत देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये असे सांगून ते म्हणाले की अतिशय वेगाने लोकांना मदत देण्यासाठी प्रस्ताव केले पाहिजेत.
मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागांच्या भेटीवर असले तरी अद्याप कुठलाही दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी दिलेली गतवर्षीची आश्वासने पूर्ण करण्याची त्यांना मोठी संधी आहे. सरकारमध्ये मदत करण्याची इच्छाशक्ती असेल तर मदत निश्चित करता येते नाहीतर घोषणा करून कोणाचेही भले होत नाही केवळ असा सर्वे करण्यापुरते मर्यादित राहू नये त्यासाठी ठोस अशी मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे केंद्रदेखील संकटात आहे इतर राज्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास राज्य कोणताही कांगावा न करता शेतकऱ्यांना मदत करतात मात्र राज्य सरकार मदत देण्यासाठी पैसा नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे महाराष्ट्र सक्षम व समृद्ध असून या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. या अतिवृष्टी व पुरामुळे केळी पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक बागा उध्वस्त झाले आहेत मात्र या नुकसानीसाठी तर करणे जास्त लावले असून ते बदलणे गरजेचे आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात जाण्याऐवजी पुलावरून पहाणे करण्यात येत असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. तसेच मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे की, केंद्राची जास्तीत जास्त मदत मिळण्याची गरज असून त्यांनी ते देण्याचे मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार मदत द्यायला तयार
राज्यावर अतिवृष्टी व पुराचे संकट आल्षयानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून सांगितले की आम्ही मदत द्यायला तयार आहोत त्यामुळे प्रधानमंत्री अतिशय संवेदनशील असून शेतकऱ्यांना ते निश्चितच मदत करतील मात्र राज्य सरकारने सतत केंद्राकडे मदतीसाठी बोटे दाखवणे बंद करावे असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवारांना मदतीची सर्व माहिती
राज्यावर कोणतेही संकट आले तर राज्यातील जनतेला मदत करण्यासाठी केंद्राकडून मदत कधी येते त्यासाठी काय काय प्रक्रिया पूर्ण करावी लागतात याची सर्व कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार यांना आहे त्यामुळे त्यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणा व पांघरूण घालण्यासाठी केंद्र च्या मदतीकडे बोट दाखवणे चुकीचे आहे पहिल्यांदा राज्यसरकारने मदत द्यावी लागते व मदत दिल्यानंतर केंद्राकडे तसे पत्र पाठवावे लागते व त्यानंतर केंद्रीय पथक येऊन मदत दिली जाते.