- ‘त्यांना’ सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या
ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या सोबतच विविध घटकांसाठी 5 हजार 476 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. या पॅकेजमध्ये बहुतांश घटकांचा विचार करण्यात आलेला नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण, बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायीक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
- सवलती जाहीर करा
वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल, असेही फडणवीस म्हणाले.
- निधीचा तत्काळ विनियोग तत्त्वावर वापर आवश्यक
कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो अर्थसंकल्पातील घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.