बॉर्डरवर गोव्यातील ट्रक पाठवून माल राज्यात आणा : राज्याबाहेरील लोकांना प्रवेश बंद करा
प्रतिनिधी / म्हापसा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या जनतेबाबत स्वतःहून निर्णय न घेता काही सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेऊनच सर्वांच्या हिताबाबत निर्णय घ्यावा अन्यथ गोव्याची जनता कोरोनाचा राज्यात फैलाव झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनाच नावे ठेवतील. गोवा हरित झोन झाला ते मुख्यमंत्र्यांमुळे नव्हे तर गोव्याची जनता सुजाण व सुशिक्षित आहे, ती संयम ठेवून आपल्या घरात राहिली त्यामुळे कोरोनाचा प्रसार राज्यात झाला नाही अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष किशोर राव यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आज पोलीस, पत्रकार, डॉक्टर व इतरांनी योग्यरित्या सर्वांची काळजी घेतली म्हणून आम्ही हरित झोनमध्ये आलो हे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या सीमांकडे लक्ष द्यावे, नाहक कुणालाही गोव्यात प्रवेश देऊ नये. यासाठी पर्यवेक्षक पाहिजे तर आम्ही देतो.
गोव्याचे जे कामगार आहेत ट्रकमालक आहेत त्यांना बॉर्डरवर न्या. माल त्या गाडीतील गोव्यातील गाडीमध्ये न्या व सॅनिटाइझ करून बॉर्डरवरून गोव्यात आणा कारण त्यांच्यावर आमचे नियंत्रण असेल व तेथे कोण जातो. सौरभ, प्रसाद, इस्माईल जातो हे आम्हाला माहित असणार, त्याला काही समस्या उद्भवल्यास आम्हाला माहिती मिळणार. बाहेरील 21 दिवसांपूर्वी बाहेर गेलेला ड्रायव्हर कसा आहे हे आम्हाला कसे कळणार? गुटखा दुकाने सुरू झाली आहेत. ती आम्हाला खुली आढळल्यास आम्ही उद्ध्वस्त करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मटकाही पुन्हा सुरू झाला आहे तो बंद करावा अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकारांना खास पॅकेज द्या वृत्तपत्रातील ज्या मोठय़ा कंपन्या आहेत त्यांनी आपला कामगारवर्ग म्हणजे पत्रकारांना 50 टक्केच मानधन देण्याचे ठरविले आहे ते गैर असल्याचा आरोप किशोर राव यांनी केला आहे. मानधन कमी करण्याचे कारण काय? कोविड काळात पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करताही सर्वत्र फिरले आहेत. पत्रकारांवर हा अन्याय आहे. कंपन्यांनी त्यांना पूर्ण मानधन द्यावे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना खास पॅकेज द्यावी अशी मागणीही श्री. राव यांनी यावेळी केली.