मुख्यमंत्री-मेळावलीवासियांची बैठक फिसकटली
वाळपई / प्रतिनिधी
जवळपास सहा किलोमीटर परिसरामध्ये प्रत्यक्षपणे पाहणी करून गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पासंदर्भात अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन मेळावलीवासियांना देऊनसुद्धा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत प्रकल्पासंदर्भात घेण्यात आलेली बैठक फिस्कटली. मुख्यमंत्र्यांनी आयआयटीमुळे या भागातील जनतेवर कोणत्याच प्रकारचा अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतरही आयआयटी विरोधकांनी ‘गो बॅक आयआयटी’ अशा प्रकारच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांसमोरच विरोध केला.
गेल्या चार महिन्यापासून गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या नियोजित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. प्रकल्पासंदर्भाचे भूमापन कार्य नागरिकांच्या विरोधामुळे बंद करण्यात आलेले आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत चालीस लागावा यासाठी गोवा सरकारतर्फे वेगवेगळय़ा माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार गेले मुख्यमंत्री
स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या भागामध्ये प्रत्यक्ष येऊन प्रकल्पासंदर्भाची माहिती ग्रामस्थांना द्यावी, मागणी करण्यात येत होती, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी काल गुरुवारी शेळ मेळावली येथे प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यानंतर स्थानिकांशी वेगवेगवेगळय़ा मुद्यांवर संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकांना या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र उपस्थितांनी आयआयटी विरोधात ‘गो बॅक आयआयटी’ अशी घोषणा देऊन प्रकल्पाला विरोध केला.
संपूर्ण परिसराची दोन तास चालत केली पाहणी
नियोजित आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार असलेल्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची झाडे व काजू बागायती आहेत. अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी या परिसराची प्रत्यक्षपणे पाहणी करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी जवळपास दोन तास डोंगर भागांमध्ये प्रत्यक्ष फिरून त्यांनी ही पाहणी केली. यावेळी त्यांना स्थानिक नागरिक व पंचायत सभासद अरविंद अर्जुन मेळेकर, शुभम शिवलकर, पांडुरंग शिवलकर, राम मेळेकर यांनी संपूर्ण परिसराची माहिती दिली. या जंगलामध्ये अनेक प्रकारची जैविक संपदा असून या प्रकल्पामुळे त्यांच्यावर आघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, तालुक्मयाचे मामलेदार दशरथ गावस, वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, उपअधीक्षक गुरुदास गावडे, नगरगाव माजी जिल्हा पंचायत सभासद प्रेमनाथ हजारे व अनेक पत्रकारांची खास उपस्थिती होती.
पुढील दोन पिढय़ांचा विचार करा : मुख्यमंत्री
हा प्रकल्प या ठिकाणी आणण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा उद्देश नव्हता. या भागातील जनतेचा सर्वप्रथम व नंतर तालुका व नंतर गोवा राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करूनच या प्रकल्पासंदर्भात सरकारने निर्णय घेतलेला आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास पुढील अनेक पिढय़ांचा विकास होणार असून सर्वसामान्य जनतेवर कोणत्याही प्रकारचा अन्य होणार नाही. या प्रकल्पासंदर्भात असलेले गैरसमज भागातील जनतेने बाजूला ठेवून या प्रकल्पाला आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मेळावलीत ‘मोती डोंगर’ अजिबात होणार नाही
स्थानिकांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे या भागांमध्ये मोतीडोंगर अजिबात होणार नाही. त्याची काळजी पूर्णपणे सरकार घेणार आहे. कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेणे हे प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून हानिकारक होऊ शकते. नोकरीच्या संदर्भात या भागातील जनतेला प्राधान्य देऊन व्यवसायाच्या माध्यमातून या भागातील जनतेला प्राधान्य देण्यात येईल, अशा प्रकारचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
आयआयटीच्या पाहणीसाठी तरुणांना चेन्नईत पाठवू
अशा प्रकल्पाच्या माध्यमातून भागातील विकासाला कशाप्रकारे चालना मिळू शकते यासंदर्भाचे उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गरज पडल्यास त्याभागातील सुशिक्षित तरुणांना चेन्नई याठिकाणी पाठवून आयआयटी प्रकल्प संदर्भाची सविस्तरपणे माहिती देण्याची सरकारची तयारी आहे. भागामध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून एक समन्वयक समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून सर्व अडचणी दूर करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
सभेत अचानकपणे प्रकल्पाविरोधात भूमिका
मुख्यमंत्री बोलत असताना अचानकपणे उपस्थित असलेल्या महिला आंदोलकांनी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत या भागामध्ये नकोच, अशा प्रकारची भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या वतीने बोलताना सडयो मेळेकर यांनी सांगितले की आतापर्यंत या भागातील जनतेने या प्रकल्पाला पूर्ण विरोध दर्शविलेला आहे. यासाठी अनेक प्रकारचे धार्मिक कृत्ये केलेली आहेत. यामुळे अचानकपणे वातावरण तंग बनले. गो बॅक आयआयटी अशा प्रकारच्या घोषणा देऊन या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला.
मुख्यमंत्र्याचे कौतुकास्पद धाडस
या प्रकल्पाला विरोध करणाऱया घोषणा सुरु असतानाच मुख्यमंत्री म्हणाले की आपण तुमच्यासमोर भांडण्यास आलेलो नाही. आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहे. आपण घोषणा दिल्या तरी सुद्धा मला अजिबात वाईट वाटणार नाही. नंतर त्यांनी घोषणा देणाऱया विरोधकांच्यामध्ये जाऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनी गवळी भगिनीच्या घरी घेतला चहा
महत्वाची बाब अशी की प्रकल्पाच्या विरोधात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतरसुद्धा माघारी परतताना मुख्यमंत्र्यांनी धनगरवाडा भागामध्ये जाऊन संपादित जमिनीची अप्रत्यक्षपणे पाहणी करण्याचा प्रयत्न केला. सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या गवळी कुटुंबातील एका भगिनीने आपल्या अस्तित्वासंदर्भात प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला असता त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन चहा घेतला. गवळी भगिनीने त्यांचे अभिनंदन केला. मुख्यमंत्री आपल्या घरी आल्याचा आनंदही त्यांना लपविता आला नाही.
सर्वसामान्याचा कळवळा असलेला मुख्यमंत्री :
नगरगांव जिल्हा पंचायत माजी सभासद प्रेमनाथ हजारे यांनी यावेळी बोलताना सांगितले की सर्वसामान्यांची काळजी असलेल्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्षपणे या भागामध्ये येऊन विरोधकाशी बोलण्याची केलेली तयारी खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचा सर्वसामान्य मुख्यमंत्री राज्याला मिळणे हे खरोखरच आमचे भाग्य असून सरकारने या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील जनतेवर कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.