ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली असून, भारत कोरोना लसीबाबत आत्मनिर्भर आहे. 16 जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्याची तयारीही जवळपास पूर्ण होत आली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रनही यशस्वी पार पडला आहे. त्यावरून भारताची ताकद लक्षात येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींनी दुपारी 4 वाजता बैठक घेतली. बैठकीत सर्व राज्यातील कोरोनाची सद्यपरिस्थिती आणि लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला.
मोदी म्हणाले, भारतीय औषध नियामक मंडळाने ‘कोविशिल्ड’ आणि कोव्हॅक्सिन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. या लसीचे उत्पादन देशात होत आहे. सुरुवातीला डॉक्टर्स, आरोग्य सेवक आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर 50 वर्षांवरील लोकांना आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाईल. पुढील काही महिन्यात देशातील 30 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.
जगातील इतर लसीकरण मोहिमांच्या तुलनेत भारतातील लसीकरण काहीसे आव्हानात्मक असणार आहे. ज्या लोकांना लस घेतल्यानंतर त्रास होईल, त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.