गळती काढण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
प्रतिनिधी/ सातारा
गेली कित्येक वर्ष पालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेली पाण्याची गळती पालिकेला निघत नाही. दुसऱया बाजूला सातारकरांना मिळणारे हक्काचे पाणी कपात करता अन् पाणी वाचवल्याचा मोठा आव आणता म्हणजे असल्या कारभाराला नेमके म्हणावे तरी काय?, गळती काढण्यासाठी अपयश आलेल्या पालिकेच्या निषेधार्थ मुख्याधिकाऱयांनाच आम्ही पाण्याने अंघोळ घालणार होतो. परंतु ते न सापडल्याने पाण्याची बादली त्यांच्या केबीनबाहेर ओतत आहोत, जर गळत्या काढल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुनील काळेकर यांनी दिला आहे.
सोमवारी भाजपाचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी पालिकेत आंदोलन केले. त्यांच्यासह अजय शिवदास, अतुल इंगळे, मनोज अवघडे, प्रशांत येवले, महादेव बनसोडे, स्वप्नील पोळ, गणेश निकम, विनायक शेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. जेथे पाणी वाया जात होते तेथे सुनील काळेकर यांनी बादली पाण्याने भरली आणि तेथून भरलेली बादली घेऊन ते चालत पालिकेत आले. पालिकेत अगोदर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या केबीनकडे गेले. त्यांची केबीन बंद दिसल्याने ते माघारी फिरले अन् अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या केबीनसमोर उभे राहिले. त्यांच्याही केबिनमध्ये कोणी नसल्याने त्यांनी केबिनसमोर पाणी ओतले. त्यावेळी घोषणाबाजी देण्यात आली.
यावेळी सुनील काळेकर म्हणाले, आम्ही कित्येकवेळा आंदोलने करायची गळत्या काढा म्हणून परंतु यांचे मात्र गळत्या काढण्याऐवजी पाणी कपातीचे धोरण. पाणी कपात करुन सातारकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱया या सातारा पालिकेच्या अधिकाऱयांनी गळत्या काढाव्यात अन्यथा आम्हाला याही पेक्षा उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.