नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदाची मुदत पूर्ण झाल्यानंतर सौरभ गांगुली यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवा प्रशिक्षक नियुक्तीसाठी अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर नव्याने लक्ष केंद्रित करेल, असे स्पष्ट संकेत आहेत.
अनिल कुंबळे यापूर्वी 2016-17 मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत होते. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण व गांगुली यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, कर्णधार विराट कोहलीशी मतभेद जाहीर झाल्यानंतर कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणे पसंत केले होते. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स चषक फायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर कुंबळे यांनी राजीनामा दिला होता.
आता, शास्त्री पायउतार होत असताना विराट कोहलीने देखील टी-20 नेतृत्वाचा आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असून मंडळाने देखील एकंदरीत स्थिती पाहत, कुंबळेंशी संपर्क साधण्याचा विचार चालवला आहे. कुंबळे यांच्यासमवेत व्हीव्हीएस लक्ष्मणशी देखील संपर्क साधला जाणार आहे. दोघेही शर्यतीत असतील तर अशा परिस्थितीत कुंबळेंना प्राधान्य मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र आहे.
कुंबळे व लक्ष्मण या दोघांनाही 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. शिवाय, प्रशिक्षणाची पार्श्वभूमी देखील आहे. अशा स्थितीत विदेशी प्रशिक्षक नेमण्याला दुसरी पसंती असेल. महेला जयवर्धनेशी संपर्क साधला गेला होता. पण, त्याची प्रथम पसंती लंकन क्रिकेट संघाला असेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. विक्रम राठोड प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असतील का, या प्रश्नावर मंडळाच्या दृष्टीने ते इतके सक्षम नाहीत, असे उत्तर बीसीसीआयमधील सूत्राने दिले.