तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला, नदी-नाले तुडुंब
वार्ताहर / हिंडलगा
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाणी रस्त्यावर साचून तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बेळगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मण्णूर, आंबेवाडी, गोजगे, बेकिनकेरे, सावगाव, मंडोळी, बेनकनहळ्ळी आदी गावांचा समावेश आहे. तर काही गावामधील सखल भागातील घरामध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
संततधार पावसामुळे पश्चिम भागातील राकसकोप धरण देखील तुडुंब भरल्याने काही दरवाजातून पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. त्यामुळे बाची, तुरमुरी, सुळगा (हि.), उचगाव, मण्णूर, आंबेवाडी भागातून वाहणाऱया मार्कंडेय नदीला पूरसदृष्य स्थिती प्राप्त झाली आहे. नदीतील पाणी शिवारात घुसल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे.
केंबाळी नाल्यावर पाणी
याशिवाय परिसरातील मुख्य रस्तेदेखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूणतः बंद ठेवण्याची वेळ आली आहे. खासगी वाहनांसह बसेस व इतर वाहनेदेखील या मार्गावरून जाणे बंद झाल्याने मण्णूर, आंबेवाडी व गोजग्यातील नागरिकांना शुक्रवारी घरातच रहावे लागले. तसेच बेनकनहळ्ळी येथील केंबाळी नाल्यावर देखील मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तरी देखील वाहनधारक धोका पत्करून प्रवास करत आहेत.