प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खातेवाटप केल्यानंतर आता राज्यातील प्रशासनात देखील बदल करण्यास सुरुवात केली आहे. काल सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व आयएएस अधिकारी तथा सचिवांच्या खाते खात्यांमध्ये बराच बदल करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांच्याकडे आता दक्षता, गृह, कार्मिक, सार्वजनिक बांधकाम, नागरी हवाई, खाण, वित्त नियोजन, वन, नगर व नियोजन ही खाती देण्यात आली आहे. राज्याचे विकास आयुक्त पी. एस. रेड्डी यांच्याकडे परिवहन, मत्स्योद्योग, वजन व माप ही खाती देण्यात आलेली आहेत.
संजय गिहार यांच्याकडे जलस्रोत, ग्रामीण विकास, पंचायत, गृहबांधणी, कला-संस्कृती, शासकीय छपाई, सार्वजनिक तक्रारी, नागरी पुरवठा अशी खाती सोपविण्यात आलेली आहेत.
चोखाराम गर्ग यांच्याकडे कायदा व न्याय, सहकार, हस्तकला टेक्स्टाईल, पी पी विभाग, उद्योग आणि व्यापार ही खाती सोपविण्यात आली आहेत.
रमेश वर्मा या अधिकाऱयाकडे आता महसूल, माहिती संचालनालय देण्यात आले आहे. रवि धवन यांच्याकडे शिक्षण, आदिवासी कल्याण, पर्यटन, कारखाना आणि बाष्पक ही खाती सोपविण्यात आली आहेत.
डॉ. तारिक अन्वर यांच्याकडे नगरविकास, वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान याशिवाय ईएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम पाहतील. अरूणकुमार मिश्रा आता समाज कल्याण, राजभाषा, पर्यावरण, कृषी, पशुसंवर्धन ही खाती सांभाळतील.व्हाय. राजशेखर यांच्याकडे वीज, अपारंपारिक ऊर्जा, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि वस्तुसंग्रहालय ही खाती सोपविण्यात आली आहेत.
मुख्यमंत्र्यांचे सचिव अजित रॉय यांच्याकडे क्रीडा व युवा व्यवहार, माहिती-तंत्रज्ञान हाती सोपविण्यात आली आहे.
हेमंत कुमार यांच्याकडे सर्वसामान्य प्रशासन, शिष्टाचार आणि कमिशनर स्टेट टॅक्सेस ही खाती सोपविण्यात आली आहेत. यानंतर लवकरच अनेक अधिकाऱयांच्या देखिल बदल्या करण्यात येणार आहेत.