केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा ः चूक केल्यास दंगल घडविणारे येतील सत्तेवर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुजफ्फरनगर आणि देवबंदचा दौरा केला आहे. तेथे आयोजित प्रचारसभेदरम्यान बोलताना शाह यांनी जनतेला मुजफ्फरनगर दंगलींची आठवण करून दिली. मुजफ्फरनगर दंगलीच्या पीडितांना आरोपी करण्यात आले आणि जे आरोपी होते, त्यांना पीडित करण्यात आले होते. पोलिसांनी मतपेढी विचारात घेत कारवाई केली होती. हजारो बनावट गुन्हे नोंद करण्यात आले होते. परंतु याप्रकरणी भाजप मुजफ्फरनगर दंगल पीडितांसोबत पर्वताप्रमाणे ठाम उभा राहिल्याचे म्हणत शाह यांनी अप्रत्यक्षपणे अखिलेश यादव यांना लक्ष्य केले आहे.
मुजफ्फरनगर आणि पूर्ण पश्चिम उत्तरप्रदेशच्या जनतेला दंगलींचा विसर पडला का असे विचारण्यास आलो आहे. जर याचा विसर पडला नसेल तर मतदान करताना चूक करू नका. अन्यथा पुन्हा दंगली घडवून आणणारे राज्याच्या सत्तेवर येतील. भाजपच्या शासनकाळात आतापर्यंत एकही दंगल झालेली नाही. दंगल घडविणारे तुरुंगात आहेत. भाजपने उत्तरप्रदेशात कायद्याचे शासन प्रस्थापित केले आहे. अखिलेश यादव यांनी शुक्रवारी मुजफ्फरनगरचा दौरा करत कायदा-सुव्यवस्थेची स्थिती योग्य नसल्याचे म्हटले होते. परंतु त्यांना अशाप्रकारचे विधान करताना लाज देखील वाटली नाही. त्यांच्याच शासनकाळात येथे दंगल घडली होती असे शाह म्हणाले.
सप सरकारमध्ये येणार माफियाराज
उत्तप्रदेशात सप आणि बसपचे सरकार आल्यास पुन्हा एकदा माफियाराज येणार आहे. जातीयवाद टोकाला पोहोचेल. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अखिलेश सरकारच्या तुलनेत दरोडय़ांच्या प्रकरणांमध्ये 70 टक्क्यांची घट झाली आहे. लुटीच्या घटनांमध्ये 69 टक्के, हत्येच्या घटनांमध्ये 30 टक्के, अपहरण 35 टक्के, बलात्काराच्या प्रकरणांमध्ये 30 टक्यांहून अधिक प्रमाणात घट झाली आहे. अखिलेश यादव यांनी स्वतःच्या शासनकाळातील आकडेवारी जनतेसमोर मांडावी, परंतु ते असे करणार नाहीत याची खात्री आहे. भाजपला मतदान केल्यास उत्तरप्रदेशला आघाडीचे राज्य करू असे शाह म्हणाले.
अखिलेश अन् जयंत चौधरींवर निशाणा
उत्तरप्रदेशात अखिलेश यादव आणि जयंत चौधरी हे मतमोजणीपर्यंत साथ आहेत. सप सरकार आल्यास आझम खान सरकारमध्ये येतील आणि जयंत चौधरी बाहेर पडतील. सप-रालोद आघाडीच्या उमेदवारांची यादी पाहिल्यास निवडणुकीनंतर काय घडणार हे दिसून येत असल्याचे म्हणत शाह यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
जात अन् परिवार
बसपचे सरकार सत्तेवर असताना एका जातीबद्दल केवळ विचार व्हायचा. काँग्रेसकडून केवळ कुटुंबाबद्दल बोलले जायचे. समाजवादी पक्षाकडून केवळ गुंड आणि माफियांना झुकते माप मिळत होते. परंतु आता राज्यात सबका साथ आणि सबका विकास आहे. उत्तरप्रदेशात प्रत्येक जण सुरक्षित असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
देवबंदमध्ये प्रचार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी देवबंदचा दौरा केला आहे. 1952 नंतर देवबंदला भेट देणारे शाह पहिले गृहमंत्री ठरले. तेथे त्यांनी भाजप उमेदवाराकरता प्रचार केला आहे. शाह यांच्या समर्थनार्थ यावेळी देवबंदच्या रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून आली. देवबंदनंतर ते सहारनपूरसाठी रवाना झाले.